हिंगोली: शहरात भटक्या कुत्र्यांंची संख्या चार-पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारीही वाढत आहेत. नागरिकांच्या तक्रारींची तक्रार घेऊन लवकरच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार असून, त्यांच्या नसबंदीवरही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
गत चार-पाच वर्षांपासून शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात अशी एकही गल्ली नाही की, जिथे मोकाट कुत्रे नाहीत. शहरातील शास्त्रीनगर, तोफखाना, पेन्शनपूरा, जिजामातानगर, कापड गल्ली, मंगळवारा आदी भर वस्तीत भटके कुत्रे सर्रास फिरताना आढळून येत आहेत. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धावून येऊन चावाही घेत आहेत. एवढेच काय, भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत, परंतु नगरपालिका दखल केलेल्या अर्जाची घेत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. आजपर्यंत स्वच्छता कर्मचारी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचे, परंतु यापुढे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एखाद्या कंपनीला कंत्राट देण्यात येईल. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही नगरपरिषदे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पाच वर्षांत जवळपास २०० तक्रारी
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, आम्हाला खूप त्रास होत आहे, फिरणेही मुश्कील झाले आहे, अशा प्रकारच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, म्हणून शहरातील पाच-सहा नगरांतील जवळपास दोनशे नागरिकांनी पाच वर्षांत तक्रारी केल्या आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र असे कंत्राट कोणत्या एका कंपनीला दिले नाही. नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारीच मोठ्या हिमतीने शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करतात. या संदर्भात नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोबदलाही दिला जातो.
भटक्या कुत्र्यांची नसबंदी लवकरच करणार
भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षात घेता, त्यांची नसबंदी लवकरच केली जाणार आहे. या संदर्भात जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. कुत्र्यांच्या नसबंदीबाबत नगरपरिषदेच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखान्याला रीतसर पत्रही देण्यात येणार आहे.
येत्या पंधरा-वीस दिवसांत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर निर्णय घेण्यात येईल.
- बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक, नगरपरिषद, हिंगोली
स्वतंत्र असे कत्रांट अद्यापही दिले नाही
नगरपरिषदेच्या वतीने पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कंत्राट कोणा एका कंपनीला देण्यात आलेले नाही. नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करतात. त्या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोबदलाही दिला जातो. स्वच्छता कर्मचारी प्रामाणिकपणे ही सेवा बजावतात.
खटकाळी, अकोला बायसकडे सर्वाधिक भीती
शहरातील बसस्थानक, खटकाळी, अकोला बायपास, पेन्शनपुरा, तोफखाना, रेल्वे स्टेशन आदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रात्री-बेरात्री बाहेरगावाहून आलेल्या वक्तीच्या, वाहनांच्या मागे ही कुत्री धावतात. भीतिपोटी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास भटकी कुत्री अंगावर धावून येतात. एवढेच नाही, तर चावाही घेतात.