नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने शहरात सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेस नागरिकांचा अल्प प्रतिसाद लाभला. बहुतांश मतदान केंद्रांवर दुसऱ्या दिवशीही शुकशुकाटच असल्याने संबंधित कर्मचारी अक्षरश: बसून होते, तर काही ठिकाणी मतदारांचा तुरळक प्रतिसाद दिसून आला. विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदार नोंदणी व नाव-पत्ता दुरुस्तीची विशेष दुरुस्ती मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक मतदारसंघातील मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी व शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत मोहीम सुरू होती; मात्र दोन्ही दिवस या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद लाभू शकला नाही. नाशिकरोड, पंचवटी, सिडको परिसरातील केंद्रांवर वर्दळ दिसत नव्हती. बी. डी. भालेकर शाळेतही कर्मचारी मतदारांअभावी बसून होते. तेथे दिवसभरात सुमारे ७० व्यक्तींनी मतदार नोंदणी अर्ज दिले. इंदिरानगर येथील सुखदेव शाळेत दोन्ही दिवस मिळून १२५, स्वामी विवेकानंद विद्यालयात १००, तर राणेनगरच्या जाजू विद्यालयात १३० अर्ज नागरिकांनी भरून दिले. पंचवटीतील आरपी विद्यालयातही तुरळक मतदारांची नोंदणी झाली. (प्रतिनिधी)
एसटीचे ब्रेक निकामी; पाच प्रवासी जखमी
By admin | Updated: June 24, 2014 00:10 IST