हिंगोली : सर्पमित्र कधी पक्षीमित्र होऊ शकत नसतो, असे म्हणतात, पण पक्षी पाण्यावाचून तडफडू लागल्याचे पाहून सर्पमित्राने फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेला एक नाही, दोन नाही, तर तब्बल पाचशे घरटी तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. तयार केलेली घरटी अनेकांना नि:शुल्क देण्यात येणार आहेत.
यशवंतनगरातील सर्पमित्र मुरली कल्याणकर हा व्यवसायाने पिठाची गिरणी चालक आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने पिठाच्या गिरणीवर पत्नीसह दोन चिमुकल्यांचे पोट भरत नाही, म्हणून कर्ज काढून गाडी घेतली, परंतु दोन वर्षांपासून ती कोरोनामुळे धूळखात पडूनच आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. पक्षी अन्न, पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. पक्ष्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार करून सुरुवातीला ५ किलो धान्य बसणारी दोन डब्बे विकत घेतली अन् कामाला सुरुवात केली. तयार केलेले डब्बे चांगले झाल्याचे पाहून दोन पक्षीप्रेमींनी लगेच नेली. मग काय मुरलीचा उत्साह वाढला. आजमितीस त्याने बघता-बघता ५० घरटे स्वत: खर्च करून पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्यांस दिले आहेत.
मला काहीच कमवायचे नाही
माणसाचे आयुष्य खूप कमी आहे. मी सर्पमित्र असलो, तरी पक्षीही माझ्यासाठी तितकेच प्रिय आहेत. दुसरे आवर्जून सांगायचे असे की, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे वन्य जिवांवर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे पक्ष्यांसाठी तयार केलेले घरटे त्यांनाही देणार आहे. त्यांच्या अंगणातील झाडांवर हे घरटे बांधणार असून, पक्षी पाणी पिताना पाहणार आहे. हात चालेल तोपर्यंत हे काम मी चालूच ठेवणार आहे. या कामात पत्नी सुरेखा, मुलगा कार्तिक, मुलगी मयूरी मदत करत आहेत, असे मुरलीने सांगितले.
फोटो नंबर ३