जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्च व २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी करून कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न झाले. ५ एप्रिल रोजी संचारबंदी शिथील करून नियम व अटीचे पालन करणाऱ्या दुकानदारांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सात दिवसानंतर बाजारपेठ उघडल्याने सकाळी दहा वाजेपासूनच नागरिक खरेदीसाठी दाखल झाले होते. गांधी चौक, महावीर स्तंभ चौक यासह इतर मार्गवरील भाजी-फळ विक्रेते, इलेक्टीकल दुकाने, इलेक्टॉनिक्स दुकाने, कपडा दुकानांसह, किराणा दुकानावर नागरिक खरेदी करताना दिसून आले. यावेळी बहुतांश नागरिक मास्क वापरताना दिसून येत होते. दरम्यान, गर्दीचे सर्वात मोठे ठिकाण असलेल्या भाजीमंडईचे विक्रेंद्रीकरण केल्याने भाजी मंडईत होणारी गर्दी विभागली होती. शहरात ठिकठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा राखीव ठेवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची गर्दी विभागली होती. मात्र शहरात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन अनेक ठिकाणी होत नसल्याचे दिसून येत होते. दरम्यान, दुपारी पावणे तीन वाजताच पोलिसांची वाहने शहरातून फिरत होती. तीन वाजेनंतर दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. तरीही नागरिक तीन वाजेनंतरही रस्त्यावरून फिरताना दिसून येत होते.
फोटो :