कोरोनाचा कहर वाढल्याने आता बहुतांश डॉक्टरांना कोरोनाच्या वाॅर्डात कामाला लावले जात आहे. त्यातच नियमित सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती करून या कर्मचाऱ्यांनाही कोराेनाच्या वाॅर्डात काम दिले जात आहे. पूर्वी अशा वाॅर्डात काम करणाऱ्यांना १४ दिवसांनंतर पाच दिवस क्वारंटाइन केले जात होते. थेट कुटुंबीयात मिसळल्यास कुटुंबीयांनाही या आजाराचा धोका होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जात होती. घरातील लहान मुले, वृद्धांना याचा फटका बसू नये, यासाठी ही काळजी होती. आता आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांचे लसीकरण झाले. ६० टक्के कर्मचाऱ्यांनी तर दुसरी लस घेतली. यातील अनेकांच्या कुटुंबीयांतील वयोवृद्ध अथवा गंभीर आजाराच्या रुग्णांनीही लस घेतली. त्यामुळे या कुटुंबीयांना तेवढा धोका राहिला नसल्याने क्वारंटाइन करण्याचे आता टाळले जात आहे. त्यातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्मचारी अपुरे पडत असल्यानेही, असे केले जात आहे.
जिल्ह्यातील कोविड सेंटर ८
यामध्ये कार्यरत कर्मचारी - ४५०
माझ्या घरात पत्नी, आई-वडील, काका, काकू, भाऊ, त्यांची मुले अशी मंडळी आहे. पूर्वी चौदा दिवसांनंतर क्वारंटाइन केले जायचे. आता माझ्यासह घरातील सर्व मोठ्यांचे लसीकरण झाले. घरात मी विलगीकरणात राहतो. ड्यूटी असलेल्या दिवशी योग्य ती खबरदारी घेऊनच कुटुंबीयांशी दूरवरून संपर्क ठेवतो. घरातही मास्क वापरतो, असे एका डॉक्टरांनी सांगितले.
माझ्या घरात सासू, सासरे, त्यांची आई, लहान मुले आहेत. पतीही आरोग्य सेवेतच असल्याने आम्ही मुलांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. तेच त्यांची काळजी घेतात. वृद्धांचे लसीकरण झाले. मात्र, तरीही आम्ही शक्य तेवढे त्यांच्यापासून दूर राहतो. तरीही कधीतरी मुले जवळ येतात. त्याची काळजी वाटते, असे एका परिचारिकेने सांगितले.
आता कोरोनामध्ये बऱ्याच काळापासून काम करीत असल्याने चांगला अनुभव आला. कुटुंबीयांपैकी वृद्धांचे लसीकरण झाले. त्यामुळे पूर्वीसारखे क्वारंटाइन केले जात नसावे. शिवाय आता रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आधीच कर्मचारी कमी असल्याने सुटीच्या दिवशीही येण्याची वेळ येत आहे, असे एका ब्रदरने सांगितले.
कोरोना वाॅर्डात काम करणाऱ्या जवळपास कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबातील वयोवृद्ध व गंभीर आजारी रुग्णांचे लसीकरण झाले आहे. त्यातच या कर्मचाऱ्यांना आता या वाॅर्डात काम करण्याचा चांगला अनुभव आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे क्वारंटाइन केल्यास सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे क्वारंटाइन केले जात नाही.
डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक