रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाची मागणी
हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या पुलावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक तसेच दुभाजक बसवावे, अशी मागणी या भागातील नागिरकांनी केली आहे.
हरभरा काढणीला आला वेग
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, दाटेगाव, लोहगाव, सावळी आदी गावांत रबी हंगामातील हरभरा पीक काढणी दोन-तीन दिवसांपासून सुरू केली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी हरभरा पिकाचे चांगले उत्पन्न होईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना आहे.
वानरउड्यांना डिग्रसकर वैतागले
डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे मागील पाच-सहा दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील पत्रांवर व छतावर उड्या मारून वस्तुंची नासधूस करीत आहेत. एवढेच काय अंगणात ठेवलेल्या पदार्थावरही वानरे ताव मारत आहेत. वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने या वानरटोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी
हिंगोली : नरसी फाटा ते लिंबाळा (मक्ता) या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सद्य:स्थित रस्त्याची एक बाजू पूर्ण झाली आहे. दुसरी बाजू अपूर्णच आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्यांना वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था
हिंगोली : बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाली असल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून नवीन बसस्थानकाचे काम रखडले असल्यामुळे प्रवाशांना तात्पुरत्या जागेत बसावे लागत आहे. आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन शौचालयाची दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
कळमनुरी : तालुक्यातील कांडली, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, बऊर, रामेश्वरतांडा, कानोबा टाकळी, वाकोडी, मसोड आदी गावांत विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. वेळोवेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. परंतु, कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. महावितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.