हिंगोली : जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये विविध संवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, निकालानंतर ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने पाच गावांमध्ये पेच निर्माण झाला असून, दोन गावांमध्ये अद्यापही संभ्रम दिसूून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर २८ व २९ जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये हिंगोली तालुक्यातील उमरा, खडकद बु. (अनुसूचित जाती महिला), देवठाणा (अनुसूचित जमाती), खांबाळा (अनुसूचित जाती महिला) आरक्षण जाहीर झाले आहे, तसेच वसमत तालुक्यातील कुरुंदवाडी येथे (अनुसूचित जमाती महिला)साठी आरक्षित झाले आहे. या गावांमध्ये आरक्षणानुसार सदस्य निवडून आले आहेत. मात्र, सरपंच आरक्षणामध्ये त्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने किंवा पुरुष निवडून आले असताना महिलेसाठी जागा सोडण्यात आली आहे. यामुळे सरपंच निवडीचा पेच निर्माण होणार आहे. जिल्हास्तरावरून ८ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान सरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. नियोजित दिवशी सरपंच, उपसरपंचाची गावनिहाय निवड केली जाणार आहे. यावेळीही सरपंचपदाचे आरक्षण व उमेदवारांकडे असलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या आधारे निवड होणार आहे. यामुळे ऐन निवडीच्या दिवशीही पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या गावांमध्ये पेच
हिंगोली तालुक्यातील खांबाळा व वसमत तालुक्यांतील कुरुंदवाडी याठिकाणी सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये कुरुंदवाडी येथे या आरक्षणाची महिला निवडून आली नसल्याने उपसरपंचाची निवड केली जाणार आहे, तसेच खांबाळा याठिकाणी अनुसूचित जाती महिलेसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.
पुढे काय होणार
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यासंदर्भात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ८ ते १७ फेब्रुवारीदरम्यान तारखा निश्चित केल्या आहेत. आरक्षणानुसार उमेदवार निवडून न आल्यास त्याठिकाणी सरपंच, उपसरपंच, नियम व अधिनियम १९६० च्या कलम ३० नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सरपंच निवडीची प्रक्रिया घेण्यात येणार आहे.