हिंगोली : जिल्ह्यात कोरोनामुळे लांबलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांतीतील विहिरींसह इतर साहित्याची लॉटरी निघाली. शिवाय अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतही विहिरी मंजूर झाल्या. मात्र अर्धवट कागदपत्रांमुळे १३१७ पैकी ५३५ लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ रद्द होण्याची भीती आहे.
विशेष घटकच्या विहिरींसह सर्वच विहिरींचा लाभ आता डीबीटीवर आला आहे. ही डीबीटीची प्रक्रिया करण्यासाठी मागच्या वर्षी निवडच झाली नाही. एक वर्ष विलंबाने कार्यवाही झाली. आता निवड झालेल्या लाभार्थ्यांना कोरोनात विविध कागदपत्रे न मिळाल्याने अर्धवट कागदपत्रांवरही लॉटरीमध्ये संधी मिळाली. मात्र या लाभार्थ्यांनी मागील महिनाभरापासून याद्या लागूनही उर्वरित कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करण्याची तसदी घेतली नाही. त्यातच अनेक शेतकरी पेरणीच्या कामात अडकल्याने त्यांना हे करणे शक्य झाले नाही. मात्र आता त्यातून उसंत मिळाली असल्याने त्यांनी ही माहिती सादर करणे अपेक्षित आहे. यासाठी आधी महिन्याचीच मुदत दिली होती. मात्र कोरोना व पेरणीचा काळ असल्याने पुन्हा कागदपत्रे सादर करण्यास मुदत दिली आहे. जर आता ही कागदपत्रे सादर नाही झाली तर या लाभार्थ्यांचा लाभ रद्द करून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाण्याची भीती आहे.
काय आहेत अडचणी?
या योजनेत लाभ मिळाल्याचेच अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. काहींनी आपला मोबाइल क्रमांक टाकण्याऐवजी इतरांचा अथवा सुविधा केंद्राचा क्रमांक टाकला. त्यामुळे त्यांना संदेश मिळाला नाही. पंचायत समितीत याद्या लावल्या तरीही त्या कुणी पाहिल्या नाहीत. शिवाय काहींना अजूनही कागदपत्रेच गोळा करता आली नाहीत.
योजनानिहाय स्थिती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
निवडलेले लाभार्थी ७२९
त्रुटीतील अर्ज ३५९
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
निवडलेले लाभार्थी १७३
त्रुटीतील अर्ज ७०
राष्ट्रीय कृषी विकास योजना (एसटी)
निवडलेले लाभार्थी १२८
त्रुटीतील अर्ज २३
राष्ट्रीय कृषी विकास योजना (एससी)
निवडलेले लाभार्थी २८७
त्रुटीतील अर्ज ८३
यापूर्वीचीही रक्कम रखडली
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना कामे पूर्ण करण्यासाठी पावसाची अडचण येऊ नये म्हणून धडपड चालविली आहे. मात्र कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देयकेच सादर केली जात नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. या ठिकाणी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. तर ही देयके आता सादर झाल्याचे कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.
इतर साहित्याचाही मोठा लाभ
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विहिरींचे ४१, डिझेल इंजिनचे १३, पंपसेटचे ८, पीव्हीसी पाईपचे १९, विहीर दुरुस्तीचे ७१ व सौरपंपांचे १६ लाभार्थी आहेत. तर डॉ.आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत नवीन विहिरीचे ३३१, वीज जोडणीचे ३२, विहिरीतील बोअरचे ६२, पंपसेटचे ७७ व जुनी विहीर दुरुस्तीचे २२७ लाभार्थी आहेत. तर राष्ट्रीय कृषी विकासमध्ये फक्त नवीन विहिरीचाच लाभ मिळतो.
असा मिळतो लाभ
या योजनेत नवीन विहिरीसाठी २.५ लाख, विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० हजार, विद्युत पंप घेण्यासाठी २० हजार, सौर कृषिपंप अथवा नवीन वीज जोडणीसाठी ३० हजारांपर्यंतचा लाभ देण्यात येतो. एका लाभार्थ्यास एकाचवेळी लाभ देण्यात येतो.
शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी
शेतकऱ्यांना पहिल्यांदाच ऑनलाइन अर्ज करून विहिरींसह इतर बाबी मंजूर झाल्या. मात्र कोरोनात अनेकांना कागदपत्रांची अडचण असल्याने तसेच अर्ज स्वीकारले. आता उर्वरित कागदपत्रे न सादर केल्यास लाभ रद्द होऊ शकते. सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ ही कागदपत्रे दाखल करावीत, असे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले.