भरधाव वाहनाने धोका वाढला
हिंगोली : शहरातील काही मार्गांवर दुचाकी चालक भरधाव वाहने चालवित आहेत. यामध्ये अनेक जणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील वाहने चालवित असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालनही होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बासंबा फाटा - बासंबा रस्ता दुरुस्तीचे काम कासवगतीने
बासंबा - हिंगोली तालुक्यातील बासंबा फाटा - बासंबा रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम मागील वर्षभरापासून कासवगतीने होत आहे. जागोजागी खराब झालेल्या या रस्त्याचे काम जलदगतीने करण्यात यावे, अशी मागणी बासंबा गावकऱ्यांतून होत आहे.
खानापूर - चिंचोली रस्त्याची दुरवस्था
हिंगोली : तालुक्यातील खानापूर - चिंचोली रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठाले खड्डे असल्याने अनेक वाहनधारकांचे वाहन चालविताना कसरत होत आहे. रस्त्यावरील गिट्टीही उघडी पडली आहे. या उघड्या गिट्टीमुळे अनेक वाहनेही घसरुन पडून अपघात होत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होते.
पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा या गावानजीक माळरान आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, अनेक पाण्याचे स्रोत आटले आहेत. यासाठी माळरानातील वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अनेकदा पाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी गावातही शिरल्याचे दिसत आहे.
स्वच्छतागृहाचा वापर होईना
हिंगोली : शहरात जागोजागी स्वच्छता मोहिमेंतर्गत नागरिकांना लघुशंकेसाठी स्वच्छतागृह उभारुन देण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, अनेक नागरिक या स्वच्छतागृहाचा वापर न करता शहरात उघड्यावरच लघुशंकेसाठी बसत आहेत. यासाठी स्वच्छतागृहाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
हिंगोली : शहरातील गांधी चौक हे बाजारपेठेतील मुख्य ठिकाण आहे. याठिकाणी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसह वाहनधारकांची मोठी वर्दळ सुरू असते, पण रस्त्यावर मोकाट जनावरे फिरकत असल्याने या ठिकाणावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यासाठी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
हिंगोली : शहरातील आदर्श कॉलेजजवळील पाण्याची टाकी परिसरात नवीन सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे. या नवीन रस्त्यांवरून अनेक वाहनधारक आपली वाहने भरधाव वेगाने चालवत आहेत. या रस्त्यावरच आदर्श कॉलेज व नागरिकांचे घर असून, विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठा धोका निर्माण होत आहे. यासाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.