हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत चालला असून, संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारीही मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. शासन आदेशाप्रमाणे १५ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दीडशे ते दोनशे रुग्ण दररोज आढळत आहेत. यात संपूर्ण टाळेबंदीही करण्यात आली होती. आता या टाळेबंदीला शिथिलता दिली आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तरीही दोन दिवस टाळेबंदी राहणार आहे. मात्र, शासकीय कार्यालयांत यापूर्वी प्रवेशाला मनाई नव्हती. आता शासन आदेशाप्रमाणेच ही मनाई असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आत प्रवेश मिळत नाही. केवळ स्टाफलाच आत प्रवेश करता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामांबाबत भ्रमणध्वनीवर किंवा ई-मेलवर संपर्क साधण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
अनेकवेळा ग्रामस्थ गावातील तक्रारींची निवेदने घेऊन येतात तर आता पाणीप्रश्नावर निवेदने दिली जावू शकतात. त्यामुळे शासकीय कार्यालयांमधून गर्दी होऊन कोविडचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यालयात १५ एप्रिलपर्यंत नागरिकांनी येऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.