जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी लागू केली असून, आगारातून सुटणाऱ्या बसेसही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेस अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मृतांची संख्याही दोन आकडी झाली आहे. शेजारच्या परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाने हिंगोली जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान टाळेबंदी घोषित केली आहे. यापूर्वी १ ते ७ मार्चदरम्यान टाळेबंदी घोषित केली होती. दोन्ही वेळेस तिन्ही आगारांतून सुटणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परंतु या दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या बसेस चालूच होत्या. पहिल्या टाळेबंदीला परजिल्ह्यातून येणारी बस बसस्थानकात येत होती. पण, आजघडीला येत नाही. बसस्थानकावर येण्याऐवजी शहरातील थांब्यावर या बसेस बिनधास्तपणे थांबत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नांदेड, परभणीने वाढविली जिल्ह्याची चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST