वानरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे व परिसरात गत पंधरा दिवसांपासून वानरांचा उपद्रव वाढला आहे. वानरांची टोळी शेतातील गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांची नासाडी करीत आहे. वनविभागाला वेळोवेळी कळविले, परंतु अजून तरी वन विभागाने लक्ष दिले नाही. वानरांच्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यांवर खड्डे; वाहन चालक त्रस्त
कळमनुरी: ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले, परंतु अद्याप रस्त्यांवरील खड्ड्यांकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.
शेतीच्या कामाला मजूर मिळेनात
हिंगोली: गत काही दिवसांपासून शेतातील कामाकरिता मजूर मिळेनासे झाले आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाची पेरणी केली. सद्य:स्थितीत काही ठिकाणची ज्वारी काढणीलाही आली आहे. मजुरांंना वाढीव दर मिळत नसल्यामुळे ते शेतीच्या कामासाठी येत नाहीत.