हिंगोली: नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुती पाळल्या जात असल्याने पुरूषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. आरोग्य विभागाला ७०८ पुरूष शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. मात्र आतापर्यंत एकही पुरूष शस्त्रक्रिया झाली नसल्याचे समोर आले आहे. तर चालू वर्षात आतापर्यंत २ हजार ६९६ महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या आहेत.
कुटुंब नियोजनासाठी शासनातर्फे दरवर्षी मोहीम राबवण्यात येते. यासाठी उद्दिष्टही ठरवले जाते. तसेच शासनातर्फे शस्त्रक्रिया करणाऱ्यांना अनुदानही दिले जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना शासनातर्फे ६०० रूपये तर इतर महिलांना २५० रूपये अनुदान दिले जाते. तर पुरूषांना नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी १ हजार १०० रूपये मिळतात. स्त्रिया आणि पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जनजागृतीही करण्यात येते. मात्र, असे असतानाही महिलांच्या तुलनेत मोजकेच पुरुष शस्त्रक्रिया करत असल्याचे वास्तव आहे. चालू वर्षभरात तर जिल्ह्यात एकाही पुरूषाने शस्त्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच आहे.
जिल्ह्यात चालू वर्षात एकूण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ८ हजार ५०७ आहे. त्यापैकी आतापर्यंत २ हजार ६९६ शस्त्रक्रिया पार पडल्या. यात पुरूष शस्त्रक्रियेचा वाटा काडीचाही नसून सर्व शस्त्रक्रिया महिलांच्याच आहेत. यात जिल्हा आरोग्य विभागाला ५ हजार ६९२ चे उद्दिष्ट स्त्री शस्त्रक्रियांचे देण्यात आले होते. त्यापैकी १ हजार २५७ शस्त्रक्रिया पार पडल्या. यातील ३२५ शस्त्रक्रिया ह्या फेब्रुवारी महिन्यातील आहेत. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास २ हजार १०७ चे स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत १ हजार ४३९ चे उद्दिष्ट पार केले आहे. पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे जिल्हा आरोग्य विभागाला ५१७ चे तर जिल्हा शल्य चिकित्सक विभागाला १९१ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र एकाही विभागाला या शस्त्रक्रियेची सुरुवात करता आली नाही. त्यामुळे कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच असल्याचे दिसून येत आहे.