हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली. जिल्हा प्रशासनाचे नियम सर्वांसाठी एकच असल्याने मोठी दुकाने बंद असली तरी गल्लीबोळांतील दुकाने आणि रस्त्यावरील हातगाडे मात्र सर्रास फिरताना आढळून आली. न. प. व पोलिसांचे संयुक्तिक पथक मात्र तेथेपर्यंत पोहोचत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बघता-बघता सहा दिवस उलटूनही गेले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे पाहून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात सात दिवसांची टाळेबंदी केली होती. तरीही काही फरक पडला नसल्याचे पाहून परत २९ मार्च ते ४ एप्रिल अशी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. रस्त्याने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांना दंड लावण्यात यावा, यासाठी नगर परिषद आणि पोलिसांकडे शासनाने जबाबदारी दिली आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे पथकातील कर्मचारी हे विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंडही वसूल करीत आहेत; परंतु शहरातील गल्लीबोळांत मात्र काहीजण दिवसा आणि रात्री टोळक्याने बसत आहेत. यामध्ये बहुतांश जण हे विनामास्कच पाहायला मिळत आहेत. टाळेबंदी असतानाही गल्लीबोळांतील किराणा दुकाने सर्रासपणे सुरूच आहेत. ग्राहक मिळो अथवा न मिळो, हातगाडेही रस्त्याने वावरताना दिसत आहेत. बहुतांश हातगाडा चालकांना मास्कही नाही. टाळेबंदीतील नियम हे सर्वांसाठी एकच असल्याने हातगाडे चालक का रस्त्याने फिरत आहेत? कोरोना संसर्गाची भीती त्यांना वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गल्लीबोळांत पथक पाठविले जाणार
बाजारपेठेतील मोठे व्यापारी हे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत आहेत. गल्लीबोळांतील छोटे दुकानदार व हातगाडेवाले पालन करीत नसतील तर त्यांना दंड भरावाच लागेल. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून गल्लीबोळांतही पथकातील कर्मचारी पाठविले जातील.
- बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद