कळमनुरी : यावर्षी चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकरी आनंदी दिसून येत आहे.
यावर्षी ७४ हजार ११० हेक्टरवर खरिपाच्या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ७४ हजार ११०.८६ हेक्टर आहे. गतवर्षी दमदार पाऊस पडल्यामुळे ७४ हजार १९३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यावर्षीही हे पेरणी क्षेत्रही वाढण्याची शक्यता आहे.
तालुक्यात ज्वारीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ८ हजार ५९५ हेक्टर आहे. गतवर्षी १ हजार २७५ म्हणजे १४.८३ हेक्टरांवर ज्वारीची पेरणी झाली होती. यावर्षी हा पेरा पाच ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मक्याचे सर्वसाधारण परिक्षेत्र ९७.०४ हेक्टर आहे. गतवर्षी ५४० हेक्टरांवर मक्याचे पेरणी झाली होती. यावर्षी मक्याच्या पेरणी क्षेत्रात काहीही वाढ होणार नाही. मुगाचे सर्वसाधारण परिक्षेत्र ६ हजार ८२८.७५ हेक्टर आहे. या पावसाळ्यात पाऊस लवकर पडल्यास हा पेरा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
उडदाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २५४७.०६ हेक्टर असून याचा पेरा यावर्षी दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात तुरीचे ७ हजार १२.३३ सर्वसाधारण पेरणीक्षेत्र आहे. तुरीला बऱ्यापैकी भाव असल्याने तुरीचा पेरा काही टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यात सोयाबीनचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २६ हजार १३५.८४ हेक्टर आहे. गतवर्षी ५२ हजार ६९५.२० हेक्टरांवर ही टक्केवारी २०१.६२ टक्के आहे. यावर्षी याचा पेरा पाच ते दहा टक्क्यांनी घटून त्या बदल्यात उसाचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. हळदीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २०१९.६५ हेक्टर असून मागच्या वर्षी ४६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती.
तालुक्यात कापसाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २०८७४.६५ हेक्टर आहे. गतवर्षी ८१४० हेक्टरांवर पेरणी झाली होती. कापसाला हमीभाव नसल्यामुळे व लागवड खर्च जास्त येत असल्यामुळे यावर्षी कापसाचा पेरा काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. मागच्यावर्षी सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. सध्या शेतकरी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये गुंतलेला आहे.
यावर्षी लवकरच मान्सून पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षीही खरिपाचे उत्पन्न चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरचे वापरावे या बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
- गजानंद पवार,तालुका कृषी अधिकारी