जिल्ह्यात ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाला नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. मूग, उडीद, भुईमूग आदी पिके वगळता इतर पिकांची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. मूग, उडीद, भुईमूग पिकांची पेरणी ७ जुलैनंतर करू नये, असेही विद्यापीठाने शेतकऱ्यांना कळविले आहे. कापूस पिकाची लागवड १५ जुलैपर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्यावी. नंतर बीजप्रकिया करूनच कापसाची लागवड करावी.
गादी वाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाल्याच्या रोपांना ४५ दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून घ्यावा. टोमॅटो, वांगी, मिरची या पिकांची पुनर्लागवड करून घ्यावी, असेही आवाहन विद्यापीठाने केले आहे.
शेळ्या, मेंढ्या उघड्यावर बांधू नयेत
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शेळ्या, मेंढ्यांना उघड्यावर बांधू नये. पावसात भिजल्यास शेळ्या, मेंढ्यांना आजार होऊ शकतो. विशेष म्हणजे शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फुसाचा आजार होण्याची शक्यता असते. तसेच दलदल जमिनीमुळे खूर सडण्याची शक्यता असते. परिणामी अनेक समस्या उद्भवू शकतात.