सिग्नल पडले धूळखात
हिंगोली : शहरातील गांधी चौक, नांदेड नाका, नगर परिषद आदी ठिकाणी बसविण्यात आलेले वाहतूक सिग्नल मागील अनेक दिवसांपासून धूळखात पडले आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन बंद पडलेले वाहतूक सिग्नल त्वरित सुरु करावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
धूर फवारणीची नागरिकांनी केली मागणी
कळमनुरी : शहरातील मुख्य रस्ता व शहरातील अनेक नगरात गेल्या काही दिवसांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी रस्त्यांवर येत आहे. दुसरीकडे डासांचे प्रमाण वाढत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन शहरात धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
हरभरा पीक जिल्ह्यात जोमात
हिंगोली : गत आठवड्यात तापमानात मोठी घट झाली. त्याचा फायदा हरभरा पिकाला झाला आहे. जिल्ह्यात सध्या हरभरा पीक चांगल्या स्थितीत आहे. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून, थंडीही चांगली पडत आहे. त्यामुळे गहू व हरभरा पिकांची चांगली वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही पिकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सवड भागात गहू पिकाला पाणी देणे सुरु
सवड : हिंगोली तालुक्यातील सवड व परिसरातील शेतकरी मागील दोन दिवसांपासून गहू पिकाला पाणी देण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीने कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन रबी हंगाम चांगला येईल, अशी आशा सवड भागातील शेतकऱ्यांना आहे.