हिंगोली नगरपालिकेला माझी वसुंधरा अभियानात राज्यातील पहिले पारितोषिक मिळाले आहे. राज्यात या अभियानात यश मिळविणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिकांशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर, अभिनेता आमिर खान, पानी फाउंडेशनचे सत्यजीत आदींनी संवाद साधला. या अभियानात यश मिळविल्यानंतर या पालिकांनी पुढेही सातत्य कायम ठेवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या उपक्रमांबाबत इतर मान्यवरांनीही सांगितले. यावेळी ठाकरे यांनी यशस्वी ठरलेल्या संस्थांच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. तसेच त्यांच्या यशाचे रहस्य जाणून घेतले.
यावेळी राज्यात पहिल्या आलेल्या हिंगोलीच्या मुख्याधिकाऱ्यांना राज्यात सर्वत्र या अभियानासाठी फायदेशीर ठरतील, अशा दोन बाबी सुचविण्यास सांगितले. त्यावर मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी आधी सर्व शासकीय कार्यालयांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्यास जनतेकडून याचा आदर्श घेऊन हे काम केले जाईल. शिवाय शासकीय यंत्रणांकडे बोट दाखविण्याची संधी लोकांना मिळणार नाही. त्याचबरोबर शिवकालीन बारवा अथवा त्या शहरानजीकची नद्यांचे पुनरुज्जीवन केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ह्या बारवा गाळाने भरल्या असून त्या मोकळ्या कराव्या लागतील, तर नद्यांच्या घाटांचे सौंदर्यीकरण केल्यास वापर आणखी वाढेल आणि वृक्षारोपण व इतर बाबींचे महत्त्व कळेल. मान्यवरांनी या दोन्ही सूचना उचलून धरल्या, तर शासकीय कार्यालयांना जलपुनर्भरण बंधनकारक करण्याचा माझाही विचार होता, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.