हिंगोली: गत दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. एवढेच काय, अनेकांना इहलोकही सोडावा लागला आहे. या वर्षी कोरोना महामारी हा आजार माणसांपासून दूर जावा, सर्वांच्या घरात सुखसमृद्धी नांदावी, अशी प्रार्थना मसनजोगी समाजाने स्मशानभूमीत गुढी उभारून केली. शहरातील अकोला बायपास रोडवर मसनजोगी समाजाची सात कुटुंबे वास्तव्यास आहेत. स्मशानभूमीत आलेल्या प्रेताचे दहन करण्याचे काम हे कुटुंबे वर्षानुवर्षे आजतागायत करीत आहेत. विशेष म्हणजे, प्रेताचे दहन करण्यासाठी हा समाज कोणतीही अट घालत नाहीत. प्रेताचे दहन केल्यानंतर जे पदरात पडेल, त्यातच ते समाधानी असतात. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे आलेल्या प्रेताचे दहन करून त्यावरच मसनजोगी समाज उदरनिर्वाह करतो. शासन दरबारी अनेक वेळा विनंती-अर्ज केले, परंतु अजूनही मसनजोगी समाजाकडे शासनाने लक्ष दिले नाही, अशी तक्रारही मसनजोगी समाजाची आहे.
मराठी महिन्याप्रमाणे गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी प्रत्येकाच्या घरात गोडधोड करून गुढी उभारण्याची अनेक वर्षाची प्रथा आहे, परंतु गरिबी ही पाचविला पुजली आहे. त्यामुळे दरवर्षी आम्हा मसनजोगी समाजाला स्मशानतच गुढी उभारावी लागते, अशी कैफियतही या समाजाने मांडली. आमची आज चौथी पिढी आहे. आजही पडक्या आणि पत्राच्या शेडमध्ये राहून घरसंसार चालवावा लागतो.
कोरोनाची भीती आहे, पण सर्वकाही पोटासाठी
कोरोनाची भीती कोणाला नाही. भीती तर सर्वांनाच आहे. अहो, आश्चर्यच म्हणावे लागेेल, ते म्हणजे आमची लेकरंबाळं तर प्रेत जळत असते, त्यावेळेस तिथेच ती खेळत असतात. त्यांना कुठेही खेळण्यासाठी जागा नाही. लेकरांना किती थोपविले, तरी लेकरे जवळून जातात, पण ‘ देवाच्या कृपेने’ अजून तरी त्यांना काही झाले नाही. आज आमची चौथी पिढी आहे. शासनाने आमचा विचार केला नाही. याचे आम्हाला काही वाईट वाटत नाही. निदान आमच्या लेकराबाळांसाठी मसनजोगी समाजाला इतरत्र घरे बांधून द्यावीत, जेणेकरून पुढची पिढी तरी सुधारेल, अशी आर्त विनंतीही मसनजोगी समाजाने शासनाकडे केली आहे.
- सुरेश शेषराव इरेवाड, हिंगोली
फोटो नंबर ५