सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे शेतातच खरीप पिकांना मोड फुटले होते. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झाले. यानंतर, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली, परंतु काहींच्या पदत ती मदत पडली, तर काहींना अजूनही त्या मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर, करंजी, दारेफळ, गुंडा, कुडाळा, विरेेगाव, वडद, नाहाद आदी गावांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू या पिकांबरोबर दुहेरी उत्पन्न देणाऱ्या हरभरा पिकाला पसंती दिली. परिसरात हरभरा पिकांचीही काढणीही झाली असून, हरभरा पिकाने अनेक शेतकऱ्यांना तारले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.
शासनाने हरभरा पिकाला चांगला भाव द्यावा
करंजीसह परिसरातील शेतकरी कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ या संकटाला सामोरे जात आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाने दुहेरी उत्पन्न देणाऱ्या हरभरा पिकाला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.