हिंगोली: महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जायचे झाल्यास कोरोना चाचणी आवश्यक असून तसे केंद्राने कळविले आहे. परंतु, काही प्रवासी अजूनही कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. कोरोना तपासणीबाबत रेल्वे विभाग प्रवाशांना विचारणा करीत असल्याचे सांगण्यात आले.
गत महिनाभरापासून रेल्वेची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिसरी लाट समोर असून प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत, परंतु काही प्रवासी मास्क न घालताच प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. जे प्रवासी प्रवासादरम्यान मास्क घालणार नाहीत, त्या प्रवाशांना रेल्वेने नियुक्त केलेले पथक दंडही लावत आहेत. महाराष्ट्रातून इतर राज्यात जायचे झाल्यास कोरोना महामारीची तपासणी करणे अनिवार्य आहे, असे केंद्राने कळविले आहे. तिकीट काढतेवेळेस रेल्वे विभागही कोरोना तपासणी केली आहे का? याची विचारणा करीत आहे.
सध्या सुरु असलेल्या रेल्वे
नांदेड ते अमृतसर
नांदेड ते गंगानगर,
अमरावती ते तिरुपती
नरखेड ते काचीगुडा
या रेल्वे कधी सुरु होणार ?
अमरावती ते पुणे, अजनी कुर्ला
पॅसेंजर रेल्वेबाबत अजून काही सूचना आलेली नाही. रेल्वे विभागाची सूचना आल्यास प्रवाशांसाठी पॅसेंजर सुरु केली जाणार आहे.
कोरोना टेस्टबाबत विचारणा केली जात आहे
महाराष्ट्रातून इतर राज्यात साधे तिकीट किंवा आरक्षण तिकीट काढून कोणी जात असेल तर त्या प्रवाशांना तिकीट काढतेवेळेस ‘कोरोना तपासणी केली आहे का? तपासणी प्रमाणपत्र आहे का? याची विचारणा केली जात आहे, असे रेल्वे विभागाने सांगितले.
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला आरक्षण मिळू लागले
कोरोना महामारीचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढू लागली आहे. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे पाहून प्रवाशांनी मोठ्या शहरात जाणे बंद केले होते. कोरोनाची तिसरी लाट समोर ठेवून प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्यातरी प्रवाशांना आरक्षणही मिळू लागले आहे.
कोरोना कमी झाला असून रुग्णही कमी आढळून येत आहेत. परंतु, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क घालूनच प्रवास करावा. जे प्रवासी मास्क घालणार नाहीत, त्यांना नियमाप्रमाणे दंडही भरावा लागणार आहे.
- रामसिंग मीना, स्टेशन मास्टर, हिंगोली