हिंगोली : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील मुख्य भाजीमंडईचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी शहरात फळ भाजीविक्रेत्यांसह शेतकऱ्यांना आठ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर येथून व्यवहार चालणार असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.
जिल्ह्यासह हिंगोली शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी संचारबंदीची मुदत संपली असून, संचारबंदी शिथिल झाल्यानंतर मुख्य बाजारपेठेत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील मुख्य भाजीमंडईमध्येही होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना आखल्या आहेत. शहरात आठ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असून, यात सहा ठिकाणी फळ-भाजीविक्रेत्यांना, तर दोन ठिकाणी विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी तसेच ग्राहकांना उभे राहण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत. विक्रेते व ग्राहकांची गर्दी होणार नाही, नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्य भाजीमंडईमधील स्थायी दुकाने वगळता इतर फळ-भाजीविक्रेते, फेरीवाले हे भाजीमंडईमधील रोडवर किंवा रोडलगत व्यवसाय करणार नाही, याबाबत दैनंदिन पाहणी करण्यासाठी एका पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फळ-भाजीविक्रेत्यांसाठी जागा
-जिल्हा परिषद बहुविध प्रशाला मैदान
-खटकाळी बायपास परिसर रोडलगत
-रेल्वे स्टेशन मैदान
-नवीन नगर पालिका इमारत ते बिरसा मुंडा चौकापर्यंत डाव्या बाजूच्या रोडलगत
-जिल्हा परिषद गणेशवाडी शाळेलगतचा रोड
-स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी सभागृहाच्या संरक्षण भिंतीलगत, मंगळवारा
विकेल ते पिकेल योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी जागा
-अग्रसेन चौक ते एमजेपी टँकरोड डाव्या बाजूला रस्त्याच्या लगत
-तहसील कार्यालय सुरक्षा भिंतीलगत
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई
संचारबंदी शिथिल झाल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या काळातही व्यावसायिक, ग्राहकांना नियमित मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना व्यापारी, ग्राहकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
फोटो: