हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. सात दिवस सर्व व्यवहार ठप्प होणार असल्याने नागरिकांनी आठवडाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवली आहे. यासाठी २८ मार्च रोजी हिंगोली शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी पाहावयास मिळाली.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कोराेना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवीत असले तरी वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव बसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान अत्यावश्यक वस्तूंची काही दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग सात दिवस सर्व बाजारपेठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी २८ मार्च राेजी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. दर रविवारी बहुतांश दुकाने बंद ठेवली जातात. मात्र, २८ मार्च रोजी रविवार असूनही नागरिक खरेदी करताना दिसत होते. सकाळी ९ वाजेपासूनच दुकाने उघडण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत किराणा, इलेक्ट्रिकल, कपडा, इलेक्ट्रॉनिक्स, भांड्याची दुकाने आदी दुकानांवर मोठी गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे इंदिरा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या मार्गावर दुतर्फा गर्दी दिसत होती. वाहने लावतानाही पार्किंग अपुरी पडत असल्याने काही नागरिकांनी रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदी केली.
पालेभाज्या खरेदीलाही पसंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्याने तसेच रंगपंचमी, होळी सणानिमित्त खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. किराणा सामानासह पालेभाज्याही खरेदी करताना नागरिक दिसून येत होते. नागरिकांची गरज लक्षात घेता व्यापाऱ्यांनीही प्रत्येक वस्तूच्या किमती किंचित वाढवीत नफा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, किंमत वाढलेली दिसत असल्या तरी कांदा, लसूण, अद्रक खरेदी करताना नागरिक दिसत होते.