होते.
धुलीवंदन सण आणि २९ मार्च पासून लागणारा लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी उसळली होती. शहरातील सर्व रस्ते रविवारी नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना वाट शोधणे अवघड बनले होते. सर्वाधिक गर्दी दारू विक्री केंद्रावर झाल्याचे पहावयास मिळाले. तेथे कोणताच नियम पाळला जात नसल्याचे तसेच तोंडाला मास्क कोणी वापरत
नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांची कोणालाही तमा नसल्याचे वसमतमध्ये पहावयास मिळत असते. त्यामुळे कोरोनाचा आकडाही वाढत आहे. वसमत पोलीस ठाणे ते कारंजा चौक हा रस्ता आणि झेंडा चौक ते मामा चौक या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले होते. मास्क वापरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढी होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग व इतर नियम पालनाचा मागमूसही कुठे दिसत नव्हता. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेने नियमित पथक पाठवणे व त्याद्वारे कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र वसमतमध्ये नगरपालिकेला या संदर्भात उपायोजना आणि खबरदारी बाळगण्यासाठी वेळ मिळत नसल्याने सर्व आनंदी आनंद असल्याचे जाणवत होते. दरम्यान, अधून मधून कधी तरी पोलिसांसोबत किंवा पोलिस ठाण्या जवळ उभे राहून मोजक्या कारवाई करण्यापलीकडे नगरपालिकेचे कुठलेही योगदान यामध्ये दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी नगरपालिकेने कडक उपायोजना करण्याऐवजी वसमतकरांना नगरपालिकेने ढील दिल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत रविवारी झालेली गर्दी पाहता ही परिस्थिती धोकादायक असल्याचे मत प्रत्येकाच्या तोंडातून निघत होते. मात्र या गर्दीला आणि नियम भंग करणाऱ्यांना शिस्त कोणी लावावी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.