या वर्षी मृग नक्षत्रात पानकनेरगावसह सावरखेडा, कहाकर खुर्द, शिनगीखांबा, खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळसी, वाढोना, सुंदली खुर्द, वटकळी, कोंडवाडा, जयपूर आदी गावांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, हळद, आदी पिकांची पेरणी केली; परंतु, १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. महागाईने कळस गाठला असून उधारीवर काही शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले. अजून उधारीही फिटली नाही. त्यातच पावसाने दडी मारली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मृग नक्षत्रावर जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आजमितीस पिके उगवली असून दिवसराच्या कडक उन्हामुळे पिके पावसाअभावी करपून जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते पिकांना पाणी देतील. पण जे शेतकरी कोरडवाहू आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडला आहे.
.... तर शासनाने मदत करावी
गतवर्षी पानकनेरगावसह अनेक गावात अतिवृष्टी झाली. अनेकांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. यावेळेस खरीप हंगाम साथ देईल, असे वाटले होते. परंतु, दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे महागामोलाचे बियाणे वाजा जातात की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गजानन देशमुख, श्यामराव देशमुख, संतोष मरडे, संतोष देवकर यांनी केली आहे.