हिंगोली: येत्या १० मे रोजी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
सोमवारी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग तासी ३० ते ४० किलोमीटर राहील, असे म्हटले आहे.
दरम्यान, रविवारी हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकटांसह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतातील उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी भुईमुगाची काढणी सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. अवकाळी पावसामुळे जनावरांच्या चारा भिजला जातो. त्यामुळे चाऱ्याची प्रत खालावते. भिजलेला चारा जनावरे खात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाऱ्यावर आच्छादन टाकावे, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.