हिंगोली : शहरातून जाणाऱ्या बसस्थानक ते रेल्वे उड्डाणपूल दरम्यानच्या डांबरीकरण कामास सुरवात झाली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली होती. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना याचा त्रास होत होता. खडीकरणानंतर आता हॉटमिक्सद्वारे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
पुलाचे कठडे बसवा
हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गावरील ओढ्यावर उभारलेल्या पुलावरील कठडे गायब झाले आहेत. या महामार्गाचे काम होत असले तरी या कामाची गती लक्षात घेता आणखी काही महिने काम चालणार आहे. त्यामुळे ओढ्यावरील पुलाचे कठडे धोकादायक ठरत आहेत. पुलाचे कठडे बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
बसस्थानक परिसरात धुळीचे लोट
हिंगोली : शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुशोभिकरण होत आहे. हे काम अंतिम झाले नाही. यासाठी तात्पुरते शेड उभारण्यात आले आहेत. याच ठिकाणी बसेस उभ्या राहत आहेत. मात्र, बस आल्यानंतर बसस्थानक परिसरात धुळीचे लोट निर्माण होत आहेत. याचा प्रवाशांना त्रास होत असून डोळ्यांचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात पाणी शिंपडावे, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतागृहाची दुरवस्था
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मात्र, या स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने दुर्गंधी सुटत आहे. याचा त्रास कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना होत आहे. याकडे लक्ष देऊन स्वच्छतागृहाची साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.
वाहतुकीची होतेय कोंडी
हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. रेल्वे आल्यानंतर गेट बंद केले जाते. मात्र, रेल्वे गेल्यानंतर गेट उघडले असता एकाच वेळी वाहने धावत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव
हिंगोली : जिल्हाभरात बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पीक घेतले आहे. सध्या पीक बहरले असले तरी सध्या अनेक ठिकाणी हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. दरम्यान, पीक चांगले आले तर रब्बी हंगामातील झालेले नुकसान भरून निघेल या आशेवर शेतकरी आहेत.
विनाक्रमांकाच्या वाहनांची धूम
हिंगाेली : शहरात मागील काही दिवसांपासून विनाक्रमांकाची वाहने धावत आहेत. तसेच ही वाहने जोरात चालविली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. विनाक्रमांकाच्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पथदिवे सुरू करण्याची मागणी
हिंगोली : शहरातील अनेक भागातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. बंद पडलेले पथदिवे काढून त्या ठिकाणी नवीन पथदिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
खड्डे बनले धोकादायक
हिंगाली : कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील मोरवाडी परिसरात मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, पुन्हा खड्डे ‘जैसे थे’ झाले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.
ओढे, नाले आटले
हिंगोली : जिल्हाभरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. ओढे, नदी, नाले ओसंडून वाहत होते. त्यामुळे अनेकांनी बागायती पिके घेतली आहेत. ओढ्यातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली असून आता ओढे कोरडे पडले आहेत. तलावातीलही पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
वेगळी सिंगल बातमी घ्यावी. सोबत फोटो १० नंबरचा आहे.
ग्रंथ निवड समितीवर खंडेराव सरनाईक
हिंगोली : ग्रंथ निवड समितीच्या पुनर्रचनेबाबतचा शासन निर्णय बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये राज्य ग्रंथालय संघाच्या औरंगाबाद विभागीय प्रतिनिधी म्हणून खंडेराव सरनाईक यांची निवड करण्यात आली आहे.
येथील खंडेराव सरनाईक हे गेल्या ३४ वर्षांपासून ग्रंथालय चळवळीत काम करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्यावतीने त्यांची ग्रंथ निवड समितीच्या औरंगाबाद विभाग सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र २० जानेवारी रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने काढण्यात आले आहे.