हिंगोली : लॉकडाऊनकाळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार २९९ कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. मात्र अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यात सर्वांत जास्त हेळसांड हातावर पोट असणाऱ्या कामगार, मजुरांची झाली. बांधकामे ठप्प असल्याने उपासमार वाढली होती. त्यामुळे शासनाने बांधकाम कामगारांना लॉकडाऊनकाळात अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक कामगारांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या.
कार्यालयाने पुरेशी जनजागृती केली नसल्याने अनेकांना तर नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती नव्हती. त्यामुळे अनेक खरे कामगार नोंदणीपासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे कामगारांसाठी फायदेशीर ठरणारा अर्थसहाय्याचा लाभ मोजक्याच खऱ्या कामगारांना मिळाल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील एकूण बांधकाम कामगारांची संख्या - ४३३०७
लाभ मिळालेले कामगारांची एकूण संख्या - २९२९९
दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार - ३१८८
लॉकडाऊन काळात बांधकामे ठप्प झाल्याने हाताला काम नव्हते. हातऊसने पैसे घेऊन संसाराचा गाडा चालविला. कामगार कार्यालयाकडून अर्थसहाय्य मिळत असल्याचे समजल्याने अर्ज सादर करण्यासाठी गेलो होतो. मात्र दोन दिवस रांगेत उभा राहूनही अर्ज सादर करू शकलो नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले.
- बाबूराव मोरे, अंभेरी
लॉकडाऊन काळात कुटुंबाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागली. लॉकडाऊन काळात देणारे अर्थसहाय्य मिळावे यासाठी कामगार कार्यालयात नोंदणीसाठी गेलो होतो. मात्र पुरेशी कागदपत्रे नव्हती तसेच लॉकडाऊन काळात कागदपत्रे काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले.
-किशन पाईकराव,
३१८८ कामगारांना दुसऱ्या टप्प्यातील लाभाची प्रतीक्षा
येथील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात ५३ हजार ८८२ विविध कामगारांनी नोंदणी केली आहे. मात्र, अनेकांनी नूतनीकरण केले नाही. त्यामुळे ४३ हजार ३०७ कामगार विविध लाभासाठी पात्र ठरले. त्यात २९ हजार २९९ बांधकाम कामगारांना २ हजार रुपयांचे तर २६ हजार १११ कामगारांना ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले. अजूनही ३ हजार १८८ कामगार दुसऱ्या टप्प्यातील लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
कामगार अधिकारी नॉट रिचेबल
येथील जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे इतर जिल्ह्यांचाही पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीकडील पदभार सांभाळताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहत नसल्याचे चित्र आहे. कामानिमित्त येणाऱ्या कामगारांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यासंदर्भात कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया समजू शकली नाही.