हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीरातील ऑक्सिजननचे प्रमाण योग्यस्थितीत ठेवणे, फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे नागरिक प्राणायाम करण्याला प्राधान्य देत आहेत.
जिल्ह्यात कोरोना आजाराने कहर केला आहे. दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शासन, प्रशासनही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना आखत आहेत. तसेच आपल्याला कोरोना होणार नाही, यासाठी नागरिक काळजी घेत आहेत. आजार झाला तरी रोगप्रतिकार शक्ती चांगली रहावी, ऑक्सिजनचे प्रमाण योग्य रहावे, यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत. सध्या कोरोना आजारावर प्राणायाम महत्त्वाचा रामबाण उपाय ठरत असल्याचे नियमित प्राणायाम करणारे सांगत आहेत. प्राणायाम करणाऱ्यांना कोरोना आजार झाला तरी लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे हिंगोली शहरात प्राणायाम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. योग प्राणायाम करा आणि आरोग्याला बळकटी द्या, कोरोनाला दूर सारा असा संदेशही रक्षा बगडीया, अजय बगडीया, संदीप काळे, सुनिल मुळे, वंदना दारव्हेकर, मिनल काळे आदी योग साधकाकडून दिला जात आहे.
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
-प्राणायामाचे विविध प्रकार असून त्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. नियमित प्राणायामामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. श्वासाचे रोग बरा होण्यास तसेच मन स्थिर राहण्यास मदत होते.
- मधुमेह कमी होतो. वजन नियंत्रित राहते, अपचन दूर होते. पोटाच्या सर्व विकारावर लाभदायक आहे.
- आत्मविश्वास वाढून मनाची एकाग्रता वाढते. तसेच मानसिक ताण, निद्रानाश या आजारपासून मुक्तता मिळण्यास मदत होते.
- प्राणायाम केल्यावर नायट्रस ऑक्साईड वायू शरीरात तयार होतो. याचा परिणाम फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांवर होऊन त्या प्रसरण पावतात. त्यामुळे ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते.
प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात...
प्राणायाम हा पूर्णपणे श्वासाचा व्यायाम आहे. यामुळे फुफ्फुसे कार्यक्षम होतात. परिणामी प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. नियमित ध्यान केल्याने मनोबल उंचावते. ते कोरोना काळात उपयुक्त आहे.
-रक्षा अजय बगडीया
नियमित प्राणायाम केल्यानंतर सकारात्मक मानसिकता तयार होते. शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. शिवाय प्राणायाम श्वासाचे रोग बरे होण्यासाठी फायदेशीर आहे.
-सुनिल मुळे
नियमित योगा करणारे म्हणतात
प्राणायाम केल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. मनावरील ताण कमी होऊन आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारते. एकाग्रतेने केलेले अनुलोम-विलोम, कपालभाती, प्राणायामासह ताडासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन आसनेही उपयुक्त ठरतात.
- मिनल संदीप काळे
नियमित योग, प्राणायाम करीत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले असून कोरोना काळात प्राणायाम केल्याने फायदा होत आहे. शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यासह ऑक्सिजनचे प्रमाण कायम राहण्यासाठी मदत होत आहे.
- वंदना दारव्हेकर