गत चार-पाच वर्षांपूर्वीे एक दुकानआड ‘बीएसएनएल’चा क्वाईनबाॅक्स असायचा. काही महत्त्वाचे काम असेल तर त्यात एक रुपया टाकून अनेक जण घरी बोलायचे. विविध कंपन्यांचे मोबाईलचे जाळे एवढे पसरले आहे की, आजमितीस क्वाईनबाॅक्स हद्दपारच झाला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ‘बीएसएनएल’चे तीनशे ते साडेतीनशे लॅंडलाईन ग्राहकांकडे राहिले आहेत. काही दुकानदारांनी ऑर्डर देण्या-घेण्यापुरता ठेवला असून काहींनी परवडेना म्हणून बंद करून टाकला आहे. यामुळे लॅंडलाईनची ‘ट्रींगट्रींग’ कानीच पडेना झाली आहे.
केवळ ३५० लॅंडलाईन
आजमितीस हिंगोली जिल्ह्यात केवळ ३०० ते ३५० लॅंडलाईन शिल्लक राहिले आहेत. काही ग्राहकांक़डे बाकी राहिल्यामुळे बंद करण्यात आल्याची माहिती दूरध्वनी विभागाचे सहायक व्यवस्थापक संजय मोरे यांनी दिली.
क्वाईनबॉक्स झाले हद्दपार
गत चार-पाच वर्षापूर्वी मागेल त्याला क्वाईनबाॅक्स दिला होता. आजमितीस विविध मोबाईल कंपन्या बाजारात आल्यामुळे क्वाईनबाॅक्सचा वापर कमीच झाला. परिणामी क्वाईनबाॅक्स कुलूपबंद झाले आहेत.
क्वाईनबाॅक्स वापरणारे कोण?
दोन पैसे पदरात पडावे म्हणून किराणा दुकानदार, चहावाले, पानपट्टीेवाल्यांनी क्वाईनबाॅक्स घेतले होते. मोबाईलचे प्रस्थ वाढल्याने कोणीच येईना झाले म्हणून क्वाईनबाॅक्स बंद करून टाकले.
...म्हणून लॅंडलाईन आवश्यकच
तीन वर्षापूर्वी लॅंडलाईन
दुकानात होता. ऑर्डर देण्यापुरताच त्याचा उपयोग केला जायचा. सद्यस्थितीत तो बंदच आहे. तक्रार करुनही कोणी दुरुस्तीसाठी येत नाही.
- रमेश नेनवाणी, दुकानदार
ऑर्डर देण्या-घेण्यापुरता लॅंडलाईन फायद्याचा आहे. एरव्ही मात्र तो बंद ठेवावा लागतो. आजमितीस मोबाईलचे जाळे सर्वत्र पसरले असून लॅंडलाईनचे कामच नाही. त्यामुळे तो बंदच करून टाकला आहे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.