जिल्ह्यात २०१९-२० मध्ये केलेल्या सर्व्हेनुसाार हिंगोलीत १६६ पैकी ९, सेनगावात १६७ पैकी १५, वसमतला १८९ पैकी ११, कळमनुरीत २०० पैकी २१ तर औंढ्यात १५७ पैकी १० शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याचे आढळून आले होते.
शिक्षकांचे काय?
जर एखाद्या शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी असेल तर त्या शाळेतील शिक्षकांना इतर शाळेत समायोजित केले जाते. विद्यार्थीसंख्येनुसार ज्या शाळांना शिक्षकांची गरज आहे, तेथे या शिक्षकांना नियुक्ती दिली जाते. जर तरीही हे शिक्षक अतिरिक्त झाले तर मात्र प्रश्न निर्माण हाेतो. अशांबाबत वेळोवेळी आलेल्या शासन निर्देशांप्रमाणे निर्णय घेतला जातो.
विद्यार्थ्यांचे काय?
शिक्षण कायद्यानुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य अथवा शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी सक्ती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही नजीकच्या शाळेत समायोजित करण्याची व्यवस्था आहे का ते तपासूनच शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जातो. अशी पर्यायी व्यवस्था नसेल तर शासनाकडे प्रस्ताव पाठवून आहे तीच शाळा सुरू ठेवण्याशिवाय पर्याय राहात नाही.
या शाळा झाल्या समायोजित
२०१७ मध्ये जि.प.च्या ४ शाळा समायोजित झाल्या. यात जि.प. प्रा.शा. कन्या कळमनुरी, जि.प. प्रा.शा. कामठा, ता.औंढा, जि.प. प्रा.शा. वडद, ता.औंढा, जि.प. प्रा.शा. हनुमाननगर, ता.वसमत या शाळांचा समावेश आहे.
कोरोनामुळे यंदा कार्यवाही नाही
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्याचा आदेश असला तरीही त्यात अनेक बाबींकडे लक्ष ठेवावे लागते. नजीक मोठी शाळा असणे, तेथे ये-जा करणे सोयीस्कर असणे आदी बाबी तपासाव्या लागतात. यंदा कोरोनामुळे सर्वच शाळा बराच काळ बंद असल्याने यात कार्यवाही झाली नाही. मात्र २०१७ मध्ये ४ शाळा समायोजित केल्या होत्या.
-संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी, हिंगोली