रोजी गेली, तरी २९६३८ कुटुंबांना मिळणार रोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:30 AM2021-04-16T04:30:06+5:302021-04-16T04:30:06+5:30
हिंगोली : कोरोनामुळे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने ...
हिंगोली : कोरोनामुळे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने मोफत धान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील २९ हजार ६३८ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, पुरवठा विभागाला अद्याप मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत, त्यामुळे धान्याचा पुरवठा कोणत्या निकषावर करायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे.
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा परिणाम दारिद्र्य रेषेखालील तसेच गरजू कुटुंबीयांवर होत आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने अन्न सुरक्षा योजनेतंर्गत अशा लाभार्थ्यांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ८७३ एकूण कार्डधारकांची संख्या आहे. तर अन्न सुरक्षा योजनेचे १ लाख ३१ हजार ८३८ कार्ड, अंत्योदय २९ हजार ६३८ कार्डधारक, तसेच शेतकरी कार्डधारकांची संख्या ३० हजार ७७६ आहे.
तालुकानिहाय अंत्योदय कार्ड संख्या
हिंगोली - ७७३९
कळमनुरी - ६२३५
सेनगाव - ६१८९
वसमत - ५८४८
औंढा नागनाथ - ३६२७
जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांची संख्या
२९६३८
लाभार्थींना काय मिळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान, अनेक गरजू कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असतानाही केवळ कार्ड नसल्याने या योजनेचा लाभ घेऊ शकत नसल्याचे बोलले जात आहे. शासनाने घोषणा केली असली तरी अद्याप पुरवठा विभागाला मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने धान्य नेमके कसे वाटप करायचे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाने दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय चांगला असून संचारबंदी काळात मदत होणार आहे.
- संतोष कोल्हे, (कामठा फाटा)
शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. यामुळे गरीब कुटुंबांना काही प्रमाणात लाभ मिळेल. परंतु, केवळ धान्य दिल्याने भागणार नसून आर्थिक मदतही देण्याची गरज आहे.
-महादेव धाबे, नर्सी नामदेव
शासन तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देणार असले तरी हाताला काम नसल्याने घर चालविणे आवघड झाले आहे. गहू, तांदूळ यासह इतरही आर्थिक मदत दिली जावी.
-महादू नामदेवराव खराटे, कौठा