गोंदिया : व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियातील बहुतांश रस्त्यांवर व्यापाऱ्यांचा कब्जा आहे. लोकसंख्या अनेक पटींनी वाढली तरी रस्त्यांची रूंदी वाढली नाही. उलट वाहनांच्या पार्किंगमुळे रस्ते आणखीच छोटे पडत आहे. अशा परिस्थितीत केवळ फुटपाथवरील छोट्या दुकानदारांवर अधूनमधून होणारी ‘अतिक्रमण हटाव’ची कारवाई म्हणजे निव्वळ देखावा ठरत आहे. गोंदियाच्या मार्केट परिसराला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी अशा पद्धतीची दिखाऊ अतिक्रमण हटाव मोहीम न राबविता खऱ्या अर्थाने पक्के अतिक्रमण हटवावे, अशी अपेक्षा गोंदियातील सूज्ञ नागरिकांनी ‘लोकमत’च्या परिचर्चेत व्यक्त केली.गोंदिया शहरातील रस्ते नेहमीच वाहतुकीच्या कोंडीत अडकले असतात. यातच बेवारस जनावरे रस्त्यावर राहात असून बेशिस्त असलेले वाहनचालक वाटेल त्या ठिकाणी आपले वाहन पार्र्कींग करीत असल्याने शहरातील वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.शहरातील रस्ते आधीच अरूंद आहेत. त्यात या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. सोबतच साहित्य विकणारे ठेलेवाले या रस्त्यावर आपली अधिसत्ता गाजवतात. वाट्टेल त्या ठिकाणी ठेले उभे करून व्यवसाय करतात. शहरातील नागरिकांनाही कोणतीही शिस्त नाही. मार्केट परिसरात येणारे वाहन चालक आपले वाहन शिस्तीने लावून ठेवण्यापेक्षा कोणत्याही ठिकाणी उभे करुन खुशाल खरेदीला लागतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी बेशिस्तपणे वागणारे वाहन चालक, व्यापारी पोलिसांंना दोष देत मोकळे होतात. परंतु रस्त्यावर आपण केलेल्या अतिक्रमणाला पोलिसांनी किंवा नगरपरिषदेने हटवू नये, हा त्यांचा आग्रह असतो. व्यापाऱ्यांनी केलेल्या पक्क्या अतिक्रमणाला लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याचे नेहमी बोलले जाते. पण सर्वांनाच लोकप्रतिनिधी वाचविणार नाही. त्यामुळे कारवाईची सुरूवात कुठूनतरी करून त्यात सातत्य ठेवल्यास एक दिवस सर्वांनाच अतिक्रमण काढावे लागेल. हे केल्याशिवाय शहरातील अतिक्रमणामुळे होत असलेली घुसमट दूर होणार नाही असे मत चर्चासत्रात सहभागी नागरिकांनी मांडले. अनेक लोक नगरपरिषदेला सूचना न देता किंवा परवानगी न घेता आपल्या मनाप्रमाणे वाटेल त्या ठिकाणी होर्डीग लावून शहराला विद्रूप करीत आहेत. नगर परिषदेने होर्डींग जप्त व दंडाची कारवाई देखील केली आहे. मात्र त्यात सातत्य नसते. त्यामुळे त्याचाही वाईट परिणाम होत आहे. गोंदिया शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे जयस्तंभ चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, फुलचूर नाका, कुडवा नाका, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, शक्ती चौक, मरारटोली, गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक, काळी-पिवळी स्टॅन्ड, नेहरू चौक, पाल चौक येथे पार्इंट नेमण्यात आले असून दररोज वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात. याशिवाय दोन मार्शल वाहन व एक गस्ती पथक वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी असतात. परंतु शहरात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक व अरूंद रस्त्यांवरील अस्ताव्यस्त पार्र्कींग यामुळे वाहतुकीची समस्या कायम आहे. वाहनांच्या पार्र्किंगसाठी होत असलेला ‘पार्किंग प्लाझा’ प्रत्यक्षात उभा होण्यासाठी अजून किती दिवस लागतील याबाबतची शाश्वती कोणीच देत नाही.
‘अतिक्रमण हटाव’ची नाटकबाजी कशासाठी?
By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST