धानाला दोन हजार भाव द्या : राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन सालेकसा : धानाला दोन हजार रूपये हमी भाव व ५०० रूपये बोनस द्या या मागणीसाठी ८ डिसेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चामुळे येथील बाजार परिसर दणाणून गेला होता. तालुका व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने धानाला दोेन हजार रुपये हमीभाव व ५०० रुपये बोनस द्या, आठ दिवसांच्या आत विक्री केलेल्या धानाची रक्कम मिळावी, धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रिनिक वजन काटे लावण्यात यावे, धानाचे चुकारे देण्यात उशिर करणाऱ्या व्यक्तीवर त्वरीत कारवाई व्हावी, उन्हाळी धान पिकासाठी पुरेशे पाणी मिळावे, खाजगी बोरवेल धारकांना इच्छेनुसार धानपीक लावण्यात मुभा मिळावी यासह इतर मागण्यांसाठी या बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विनोद हरिणखेडे तालुका अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, रमेश ताराम, बबलू कटरे, लक्ष्मण नागपूरे यांनी केले. मोर्चात शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठनेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार सूर्यवंशी यांच्यासमोर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करीत त्यांच्या व्यथा मांडल्या. यावर तहसीलदार सूर्यवंशी यांनी पटांगणात येऊन निवेदन स्वीकार करीत शेतकऱ्यांचा समस्या शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन दिले. या वेळी मनोहर चंद्रिकापुरे, विनोद लंजे, पुजा वरखडे, गोपाल तिराले, पप्पु राणे, प्रमिला मस्करे, दौलत अग्रवाल, रविंद्र चुटे, निर्दोष साखरे, अभिषेक चुटे, मनोज शरणागत, नितेश गावड तसेच बैलबंडीचे नेतृत्व करणारे मातीलाल पटले, संतोष रहांगडाले, संतोष नागपुरे, रघुदास नागपुरे, जितेंद्र भोस्कर सहभागी झाले. (प्रतिनिधी)
हजारो बैलगाड्या तहसीलवर धडकल्या
By admin | Updated: December 8, 2014 22:36 IST