परसवाडा : गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प खळबंदा जलाशय ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून खळबंदा जलाशयात धापेवाडा प्रकल्प टप्पा दोनचे पाणी पाईपव्दारे पोहचण्यात यावे, अशी मागणी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी, चांदोरी खुर्द व जलाशयाअंतर्गत येत असलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे जलाशयाची पाईप लाईन अजूनही अपूर्ण आहे. खळबंदा जलाशय हे ब्रिटीशकालीन आहे. या जलाशयापासून पूर्वीच्या काळात चांदोरी खुर्दपर्यंत पाणी जात होते. मुबलक सिंचन होत होते. भाजपा-सेनेच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी पुजारीटोला धरणाचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी कालवे तयार केले. कोट्यवधी रुपये वाया गेले व एक थेंब पाणी कालव्याने गेले नाही. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल असताना धापेवाडा टप्पा दोनचे पाणी पाईप लाईनव्दारे टाकण्याचे आश्वासन दिले होते. पण पाईप अपुर्ण असल्यामुळे मृतावस्थेत पाईपलाईन पडून आहे. धापेवाडा टप्पा दोन बॅरेजचे लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजीत पवार आले होते. प्रफुल्ल पटेल यांनी जून महिन्यात खळबंदा जलाशयात पाणी सोडले जाईल, काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले होते. पण राज्य शासनाने पाठपुरावा केला नसल्याने काहीच झाले नाही. तत्कालीन आ.दिलीप बन्सोड यांनी पाणी जलाशयात पाच वर्षातच मिळेल, अशी खात्री दिली होती. पण समोर संधी न मिळाल्याने त्यांनी ही वरिष्ठाच्या माथ्यावर मारले. नवनिर्वाचित खासदार, आमदार असताना बोट दुसऱ्याकडे दाखवित होते. आंदोलन मोर्चे काढीत होते पण निवडून आल्याच्या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळावर एकही शब्द निघाला नाही.निसर्गाच्या भरवशावर राहून खरीप पिके घेऊनच आपला उदरनिर्वाह येथील शेतकऱ्यांना चालवावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील शेतकरी नागपूर, मुंबई, गुजरात, तेंदूपत्ता व मोठ्या शहराच्या ठिकाणी जावे लागते. सिंचनाची नियमित सोय झाल्यास गावातच काम मिळाले असते. शेतकरी सुजलाम, सुफलाम झाला असता, जिल्ह्यात आमदार, खासदार, केंद्रात व राज्यात वजन आहे. पण कुणीही मनाला लावून घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासन व्यतिरीक्त काहीच पदरात पडत नाही. ही वस्तुस्थिती पुढे येत आहे. खळबंधा जलाशयात पाणी नाही. दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. पाण्याने दडी मारली पण वैनगंगेत पाणी मुबलक आहे. धापेवाडा टप्पा दोनचे पाणी सोडले तर शेतकरी सुजलाम होईल. यावर्षी पाणी न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे. (वार्ताहर)
१० वर्षांपासून खळबंदा जलाशय वनवासात
By admin | Updated: July 16, 2014 00:15 IST