तज्ज्ञांचा सूर : कायद्याची अंमलबजावणी व इंटरनेट साक्षरतेवर भर, पालक व मुलांना लोकशिक्षणाची गरजमनोज ताजने/नरेश रहिले - गोंदियाइंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न सर्वव्यापी होत आहे. वास्तविक यातील अर्धवट ज्ञानामुळेच जास्त समस्या निर्माण होतात. त्यामुळे याला एक सामाजिक समस्या समजून याबाबतचे योग्य ज्ञान देणारी माहिती अभ्यासक्रमातच समाविष्ठ करावी, अशी सूचना मान्यवरांनी ‘लोकमत’ परिचर्चेत केली.‘सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर‘ यावर लोकमतने परिचर्चा घडवून आणली. समाजविघातक ठरू शकणाऱ्या बाबीवर प्रतिबंध घालणे शक्य आहे, मात्र पालकांनी इंटरनेट, मोबाईलचा वापर आपला पाल्य नेमका कशासाठी करतो आहे यावर लक्ष ठेवणे जास्त गरजेचे आहे. केवळ कौतुक म्हणून मुलांच्या हाती स्मार्ट फोन न देता त्यांना त्याची खरच गरज आहे हे पालकांनी तपासले पाहीजे, असा सूर लोकमत परिचर्चेत वक्त्यांनी मांडला.गुन्हेगारी ही वृत्ती असून ही वृत्ती घालविण्यासाठी समाजमनाचे प्रबोधन करावे लागणार आहे. कायद्याचे सातत्याने पुनर्विलोकन, कठोर अंमलबजावणी व शिक्षा होणे आवश्यक असल्याबद्दल सर्वांचेच एकमत होताना दिसते. गोंदियासारख्या ठिकाणी सायबर क्राईमचे गुन्हे नोंदविण्यासाठी स्वतंत्र सेल नाही. कारण या प्रकारचे गुन्हे कसे होतात याची माहितीच अनेकांना नाही. परंतू भविष्यात सर्व ठिकाणी त्याची गरज पडणार आहे. सोशल मीडियात अभिव्यक्तीचा हुंकार सहजपणे व्यक्त होतो. त्याला कोणताही आडपडदा नाही, की कुणी सेन्सॉर नाही. तो आपल्या मनात सुरू असलेली घालमेल, भावभावनांची आंदोलने क्षणार्धात जगाच्या कॅन्व्हॉसवर उमटवू शकतो. त्याच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही मिळतो. मग तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असतो. या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली. संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती या माध्यमात असल्याचे दिसून येते. याचा सकारात्मक उपयोग करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने या तंत्रज्ञानाच्या बाबतीत किमान ज्ञान मिळविणेही गरजेचे असल्याचा सूर या परिचर्चेत उमटला.
अभ्यासक्रमातच सोशल मीडिया असावे
By admin | Updated: June 14, 2014 23:39 IST