गोंदिया : येत्या जिल्हा परिषद निवडणुकीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ५३ जागांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी (दि.२) काढण्यात आली. तिसऱ्यांदा काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीने जागांच्या आरक्षणाची स्थिती पुन्हा बदलली असून यामुळे ‘कही खुशी-कही गमची’ स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुसऱ्यांदा सोडत काढण्यात आली होती. यावर १७ एप्रिल पर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत होती. यात जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी १३ आक्षेप निवडणूक विभागाला प्राप्त झाले होते. या आक्षेपांची सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानुसार शनिवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयात तिसऱ्यांदा जि.प.च्या ५३ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज दिसून येणार आहे. तर ही आरक्षण सोडत अंतिम सोडत असून या सोडतीमुळे मागील आरक्षणाच्या स्थितीत बदल झाला आहे. शिवाय यामुळे आता जि.प.ची निवडणूक लढण्यास इच्छूक उमेदवार आता आपापल्या तयारीला लागण्यास मोकळे झाले आहेत. विशेष म्हणजे मागील सोडत बघून खुश असलेल्या काही इच्छूक व विद्यमान उमेदवारांवर यंदाच्या सोडतीमुळे ‘गम’ झेलण्याची पाळी आली असावी असे म्हणता येईल. (शहर प्रतिनिधी)
स्थिती पुन्हा बदलली
By admin | Updated: May 3, 2015 01:20 IST