संतोष बुकावन लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शाळेचा दर्शनी भाग टापटीप, सभोवतालचा परिसर कोण बघतोय, शाळेच्या सभोवताली पाणीच पाणी. पाण्याचा वेढा असलेली ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगावच्या बरडटोली येथे आहे. गेल्या १४ वर्षांपासून याच स्थितीत विद्यार्थी अध्ययन करत आहेत. आजतागायत अनेक अधिकारी, पदाधिकारी होऊन गेलेत मात्र त्यांना या शाळेविषयी कळवळा येऊ नये याचे नवल वाटते. प्रशासन कदाचित एखाद्या दुर्घटनेची वाट तर बघत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. अखेर साहेब तुम्हीच सांगा, आम्ही शौचालयात कसं जायचं अशी विद्यार्थ्यांनी आर्त हाक दिली आहे.बरडटोली येथील प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ पर्यंतचे वर्ग भरतात. या शाळेत ४६ चिमुकले शिक्षण घेत आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत कॉन्व्हेंटचे वर्ग सुद्धा येथे भरतात. बरडटोलीच्या प्राथमिक शाळेजवळ इटियाडोह धरणाचा मोठा कालवा आहे. कालव्याचे पाणी झिरपून शाळेमागील खड्ड्यात साचते. शाळेच्या आवार भिंतीतून शाळेच्या मागील भागात पसरते. हा प्रकार कालव्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह बंद केल्यानंतर घडतो. यामुळे इमारत व आवार भिंतीला धोका संभवतो. इमारतीच्या धोक्यामुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
१४ वर्षांपासून शिक्षण विभाग निद्रावस्थेत- शौचालयाच्या सभोवताली पाणी साचलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना शौचालयात ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण होतो. शाळेची इमारत उतारावर असल्याने पावसाळ्यात चिलाबोडीचे पाणी शाळेच्या दर्शनी भागात सुद्धा जमा होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात कुठलीच ठोस उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर कुंभकर्णी निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनाला जाग येईल का, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
यापेक्षा दुर्दैव कोणते - आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. पुरोगामी महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीचे गोडवे मोठ्या गौरवाने गायले जातात. नव्हे हे युग शिक्षणाचे असल्याचे म्हटले जाते. शाळा आहे, शिक्षण नाही. शिक्षण केवळ कागदोपत्री आहे ही बाब सर्वश्रुत आहे. शिक्षण तर सोडाच पण, आपण शिक्षणासाठी पाठविलेले बाळ शाळेत तरी सुरक्षित आहे का, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. यात शिक्षकांचा मुळीच दोष नाही. दोष आहे व्यवस्थेचा. चिमुकल्यांना जीव मुठीत ठेऊन शौचालयात जावे लागते यापेक्षा दुर्दैव कोणते?