अर्जुनी-मोरगाव : रेशीम विभागांतर्गत कोसा प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या हंगामी कामगारांंना कामापासून वंचित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. सदर प्रकल्पामध्ये नवीन मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याने गेल्या १३ वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.कोसा प्रकल्पामध्ये हंगामी काम असते. या हंगामात मजूर कामावर ठेवले जातात. गेल्या १३ वर्षांपासून काम करणाऱ्या मजुरांना डावलून नवीन मजुरांना कामावर ठेवले जाते. अधिकाऱ्यांना ही बाब समजावून सांगितल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने कामगारांनी संघटना स्थापन करुन कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. कामगार आयुक्तांनी स्थानिक रेशीम विकास अधिकाऱ्यांना जुन्या मजुरांना कामावर घेण्यासाठी बजावले. मार्च ते जून या कालावधीत जास्त मजुरांची कामावर गरज नसल्याने मजूर कामावर ठेवा, पण आळीपाळीने कामावर घ्या, असे निर्देश दिले. मात्र जुन्या मजुरांना कामावर न घेता नवीन मजुरांना कामावर घेवून अन्याय करीत असल्यामुळे जुन्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.मागील महिन्यात जुन्या मजुरांना कामावर घेण्याचे पत्र संघटनेतर्फे देण्यात आले होते. या पत्राची पोच देण्यात आली. मात्र माहिती अधिकाराच्या अर्जावर पोच न देता अर्ज फेकल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापद्धतीने संबंधित विभागाकडून मजुरांची हेळसांड केली जात आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन जुन्या मजुरांना प्रथम प्राधान्य देऊन कामावर घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
हंगामी मजूर कामापासून वंचित
By admin | Updated: January 7, 2015 22:54 IST