लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस जोर धरत नसल्याने रोवणीच्या कामात खंड पडला आहे.त्यामुळे रोवण्या लांबल्या असून त्याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात दररोज पावसासाठी अनुकुल वातावरण तयार होते. मात्र पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस होवून तूट भरुन न निघाल्यास पुढील काळ शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी सुध्दा अडचणीचा आहे.यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसल्याने सर्वच सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. तर काही सिंचन प्रकल्पातील पाणी रोवणीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा आता राखीव साठा शिल्लक आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर रुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे मागील तीन चार वर्षांच्या कालावधीत प्रथमच रोवणीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्याची वेळ आली. तर पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने धानाच्या उत्पादनात सुध्दा १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी विभागाने सुध्दा पाऊस लांबत असल्याने पिकांची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. सध्या जिल्ह्यावासीयांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागल्या आहेत.
सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST
खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या
ठळक मुद्देयंदा पावसाने केली शेतकऱ्यांची निराशा : उत्पादनावर होणार परिणाम