ताराम दाम्पत्याचे परिश्रम : दिल्लीत १५ आदिवासी भाषांचे साहित्य सादर सालेकसा : मागील दोन वर्षापासून गोंडी भाषा संशोधनावर परिश्रम घेत असलेल्या कवियत्री उषाकिरण आत्राम (ताराम) आणि सुन्हेरसिंह ताराम या दाम्पत्याने तयार केलेल्या गोंडी साहित्याला राष्ट्रीय स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आदिवासींच्या विविध भाषेत गोंडी भाषेचे साहित्य त्यांनी सादरीकरण केले आहे. या यशस्वी सादरीकरणामुळे लोप पावत चालत असलेली गोंडी भाषा पुनजिर्वीत करण्यासाठी गोंडी साहित्यिकांना प्रोत्साहन आणि दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी साहित्य मंच व रमणिका फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) नवी दिल्ली यांच्यावतीने भारतीय भाषा केंद्र एस.एस.एस.सभागृह येथे भारतीय उपखंडातील आदिवासी भागात बोलल्या जाणाऱ्या एकूण १५ आदिवासी भाषांतील साहित्य सादर करण्यात आले. यात मध्यभारतातील गोंडवाना क्षेत्रातील गोंडी भाषेतील साहित्य ताराम दाम्पत्याने सादर केले ते सर्वश्रेष्ठ ठरले आहे. ‘विरासत की आदिवासी गोंडी कहानिया’ या शीर्षकाखाली एकूण १० कथा गोंडी भाषेत तयार करण्यात आल्या होत्या. देवनागरी लिपीचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या या १० कथांना हिंदीत भाषांतर करून सादर करण्यात आल्या. त्यामुळे गोंडी साहित्य भाषा समजण्यास सोयीस्कर ठरत आहे. तसेच गोंडी भाषा समजणे व बोलणे सोपे होऊ होणार आहे. ज्या १० कथांना गोंडी भाषेत तयार करण्यात आले. त्यात वर्धा येथील बामसेफ विधारधारेचे लेखक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला आपले कार्यक्षेत्र बनवणारे भाषा संशोधक सुभेदार प्रदीप मडावी, गोंडवाना दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम, अॅड.रामराजे आत्राम, नागपूर येथील गोंडी लेखक जी.आर.मडावी, दिग्रस (यवतमाळ) येथील लेखक बाबाराव मडावी, धानोरा (गडचिरोली) येथील लेखक मनीरावण दुग्गा, सेलू (वर्धा) येथील लेखिका वसुधा मडावी, जबलपूर येथील इंजिनियर रघुवीरसिंह मारको, बालाघाट येथील लेखिका सुशीला धुर्वे तसेच उषाकिरण आत्राम यांनी या साहित्यिकांच्या कथांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत मिळविले यशसर्व लेखकांनी आपआपल्या कथा गोंडी भाषेत लिहून आंचलिक भाषा संशोधन केंद्र धनेगाव येथे सादर केल्या त्या कथांवर संशोधन करून देवनागरी लिपीत शुध्द गोंडी भाषेत त्या भाषांतरित करण्यात आल्या. त्यानंतर गोंडवाना दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम यांनी त्या सर्व कथाचे हिंदीत भाषांतर केले. उषाकिरण आत्राम (ताराम) आणि त्याचे पती सुन्हेरसिंह ताराम यांनी आदिवासी गावामध्ये गोंडी भाषा बोलणाऱ्या लोकांशी थेट संपर्क साधून व संवाद साधून गोंडी शब्दांचा संग्रह केला आणि गोंडी साहित्य निर्माण केले. दरम्यान त्यांना अनेक अडचणींना सुध्दा तोंड द्यावे लागले. प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता त्यांनी दोन वर्षे अविरत परिश्रम घेतले. शेवटी त्यांना त्यात यश मिळाले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर गोंडी भाषेचा डंका वाजवून दाखविला.
गोंडी भाषा व साहित्याला मिळणार पुनरूज्जीवन
By admin | Updated: May 13, 2016 01:47 IST