: खासदार पटेल यांना दिले निवेदन
नवेगावबांध : केंद्र सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत दीड पटीहून अधिक वाढ केलेली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली ही भरमसाट वाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन दिले आहे.
रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे आधीच कर्जात बुडालेला शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला मातीमोल किंमत मिळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. केंद्र सरकारने शेतीला लागणाऱ्या खतांच्या किमतीत वाढ करून एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनातून केला आहे. खतांच्या किमतीत झालेली वाढ मागे घेण्याच्या बाबतीत प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय व दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर तरोणे, गंगाधर परशुरामकर, अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लोकपाल गहाणे यांनी निवेदनातून केली आहे.