गोरेगाव : ग्रामीण शेतकरी शेतमजूर वनहक्कदार, रेशनकार्ड, वृद्ध पेन्शनधारक यांच्या मागणीला घेऊन आणि वाढत्या महागाईच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्याद्वारे पंचायत समिती व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेद्वारे खंडविकास अधिकारी पुराम आणि तहसीलदार सपाटे यांना निवेदन देण्यात आले. वाढती महागाई कमी करा, नफाखोर व्यापाऱ्यांवर कारवाई करा, पेट्रोल, डिझेल, रेल्वे भाडे कमी करा, निवडणुकीतील वचने पाळा, वनहक्क जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून जमिनीचे पट्टे वाटप करा, शेतकरी शेतमजूरांना ६० वर्षात ३ हजार रुपये पेन्शान लागू करा, नवे व जुने रेशन कार्ड त्वरीत बनवून देण्यात यावे, ४५ किलो धान्य देण्यात यावे, श्रावणबाळ योजनेचे मानधन वेळेवर वाटप करा, वन विभागाद्वारे वनहक्के जमिनीचे जीपीएस करण्यात यावे, पंचायत समितीद्वारे घरकुलधारकांना प्रथम किस्त व अंतिम किस्त घर कामासाठी त्वरीत देण्यात यावी, रोजगार हमीच्या कामाचे पगार द्यावे, कृषी औजारे सरळ शेतकऱ्यांना देण्यात यावे, पं.स. सदस्य कोटा बंद करावा आदी मागण्यांचे निवेदन पं.स. आणि तहसील कार्यालयात देण्यात आले.बस स्थानक चौकातून निघालेला हा मोर्चा गोरेगाव तहसील कार्यालयावर व पंचायत समिती कार्यालयावर नेण्यात आला. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. प्रतिनिधी मंडळात कॉ.हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, नारायण भलावी, चरणदास भावे, भय्यालाल कटरे, दुलीचंद कावडे, टेकचंद काबरकर, माधोजी मेश्राम, चैतराम दियेवार, गुलाब शहरे, सुरेश बिसेन, राया मारगाये, गया क्षीरसागर, सुनीता वैद्य, इंद्रराज वाघमारे, बेनिराम नंदेश्वर यांचा समावेश आहे.पंचायत समिती आणि तहसील कचेरीसमोर मोर्च्याला रहांगडाले, गणविर, भलावी, भावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. नागरिकांची मागणी पुर्ण होइपर्यंत संघर्ष चालुच राहील असेही यावेळी सांगण्यात आले.
महागाईविरूद्ध मोर्चातून आक्रोश
By admin | Updated: July 7, 2014 23:39 IST