लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीने कोणतीही सूचना न देता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा कायमचा बंद केला. विद्युत विभागाच्या कारवाईने तालुक्यातील गावात सर्वत्र काळोखाची छाया पसरली आहे. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी गावातील पथदिवे प्रकाशमय करणे अत्यंत गरजेचे आहे.पथदिव्याचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी थकीत वीजबिलाचा भरणा करणे अपरिहार्य झाले आहे. जिल्हा परिषदेने तत्काळ प्रभावाने निधीची उपलब्धता करून द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका सरपंच सेवा संघाच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले. तालुक्यातील वीज वितरण कंपनीने थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज तोडो अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेल्या गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा एकाएकी विद्युत विभागाने कायमचा बंद केला. संपूर्ण तालुक्यात गावगाडा अंधाराच्या गडद छायेत पसरला आहे. हा तालुका आदिवासीबहुल असून, व्याघ्र प्रकल्प व नक्षलग्रस्त आहे. गावाजवळ जंगलव्याप्त परिसर असल्याने जंगली जनावरांची गावात भटकंती असते. केव्हाही अनुसूचित प्रकार घडू शकतात. गावात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम, गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते. शिष्टमंडळात तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष भोजराम लोगडे, सरचिटणीस अशोक कापगते, डॉ. अजय अंबादे, लक्ष्मीकांत नाकाडे, विश्वनाथ बाळबुद्धे, प्रतिमा बोरकर, सुनीता ब्राह्मणकर यांचा समावेश होता.
१ कोटी ९ लाखांचा निधी मंजूर - वीजबिलाचा भरणा करण्यासाठी निधीची तरतूद तालुका सरपंच सेवा संघाचे एक शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना निमगाव ग्रामपंचायत कार्यालयात भेटले. संघटनेच्या वतीने त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील पथदिव्यांच्या थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी १ कोटी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.