गोंदिया : शहराचे पश्चिम टोक म्हणजे सूर्याटोला. लांब पसरलेला या भागातील बरेच लोक गोरगरीब आणि सर्वसाधारण परिस्थितीतीमधील आहेत. दिवसभर आपल्या कामावर जाणे आणि गरजेपुरते कमावणे अशा परिस्थितीमुळे खूप अशा सोयी-सुविधांची अपेक्षा त्यांनी कधी केलीच नाही. संबंधित वॉर्ड मेंबर्सने त्यांच्या सोयी-सुविधा किंवा अडचणी दूर करण्यासाठी कधी तळमळ दाखविल्याचे दिसले नाही. केवळ निवडणुका आल्या की पैसे वाटायचे आणि मत मिळवायचे या मानसिकतेमुळेच निवडणूक येण्यासाठी विकासात्मक कामे करण्याची गरज वाटू नये, असे गंभीर सत्य ‘लोकमत’ चमूला या भागात आढळून आले.‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी लोकमत चमूने सूर्याटोलामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील हनुमान मंदिराच्या आवारात परिसरातील नागरिकांच्या तोंडून समस्या ऐकल्या. एवढेच नाही तर त्या परिसरातील समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यंत कोणत्याही पेपरचे लोक अशा पद्धतीने आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आले नाही. पण ‘लोकमत’ने हा स्तुत्य उपक्रम राबवून खरोखरच सामाजिक वसा जोपासला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत डी.डी.रहांगडाले गुरूजी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.या भागात लोक नाल्या, रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मुलभूत गरजांपासून अजूनही वंचित आहेत. घंटागाड्या कधी येत नाही. कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत. नाल्यांमधील पाणी वाहात नाही. त्यांची साफसफाई कधी होत नाही. सार्वजनिक शौचालयांची दारे तुटली आहेत. पाण्याची व्यवस्था नाही. आजही अर्धेअधिक लोक उघड्यावर शौचास जातात. पाण्याची टाकी दिड वर्षापासून बंद पडली आहे पण ती सुरू करण्याची गरज कोणाला भासत नाही. लोक काही दिवस ओरडले, नगरसेवकांना सांगितले. हो करतो, म्हणून सांगून गेलेले नगरसेवक नंतर दिसलेच नाही.गोंदिया नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये येणाऱ्या या भागाचे प्रतिनिधीत्व खालीद पठाण, शारदा हलानी, ममता बन्सोड, दीपक नशिने हे चार नगरसेवक करतात. पण त्यापैकी फक्त खालीद पठाण अधूनमधून येतात. बाकी नगरसेवक निवडणूक झाल्यापासून दिसलेच नाही असे अनेक नागरिकांनी सांगितले. अशा पद्धतीने जर नागरिकांच्या समस्यांकडे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक पाठ फिरवित असतील तर ते असून नसल्यासारखेच आहेत अशी संतप्त भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.विशेष म्हणजे या भागातील काही रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती नगरसेवकांनीच दिली होती. पण अनेक महिने लोटले तरी ते काम झालेच नाही. त्यामुळे हे रस्ते कागदावरच तर तयार झाले नाही ना, अशी शंका लोकांना येत आहे. काही रस्ते तर इतके चुकीच्या पद्धतीने बनविले आहेत ती नाली वर आणि रस्ता खाली अशी स्थिती असल्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावरून वाहात आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर स्थिती आणखीच बिकट होते. नालीचे घाण पाणी रस्त्यावरून लोकांच्या दाराशी येते. त्या दुर्गंधीमय वातावरणात राहणे अतिशय कठीण असते. पण नाईलाज म्हणून सर्वकाही सहन करावे लागते, असे लोक सांगतात. (लोकमत चमू)
समस्यांनी ग्रस्त सूर्याटोलाकडे नगरसेवकांची पाठ
By admin | Updated: May 14, 2016 01:38 IST