प्रशासनाची डोळेझाक : नागरिकांचा जीव धोक्यातकपिल केकत/देवानंद शहारे - गोंदियाशहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी गटारावरील झाकणं उघडी आहेत. आता पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरून खड्डे बुजतील. अशावेळी अनेक जण वाहनांसह या खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही.
विशेष म्हणजे मृगाला सुरूवात झाली असून कधीही पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत. एखाद्या वेळी जोरदार आला तर शहरातील हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरून जातील. त्यात रस्त्यावरून जाणाऱ्यांना हे खड्डे दिसणार नाहीत व अशात खड्ड्यात वाहन शिरले तर मोठा अपघात होऊ शकतो. न.प.प्रशासनाने देखील या खड्ड्यांपासून निर्माण होणारा धोका लक्षात घेत पावसाळ््यापूर्वी त्यांची दुरूस्ती करण्याची तसदी घेतली नाही. यामुळे शहरात उघड्यावर पडलेले हे खड्डे शहरवासीयांसाठी धोकादायक ठरणार यात शंका नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या मधातून गेलेल्या नाल्यांच्या सफाईसाठी खड्डे (आऊटलेट) ठेवण्यात आले आहेत. मात्र या खड्ड्यांवर झाकणं लावण्यात आले नसल्याने या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याचे शहरवासीय सांगताहेत. अशात या खड्ड्यांवर झाकण लावणे गरजेचे आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने त्यावर झाकण लावण्यात आले नाहीत व त्याचा भुर्दंड मात्र शहरवासीयांना सोसावा लागत आहे. नाल्यांच्या सफाईच्या दृष्टीने हे खड्डे ठेवण्यात आले असले तरी यामध्येच कचरा टाकला जात असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळते. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी अद्याप नाल्यांची सफाई झालेली नाही. यामुळे पावसाचे पाणी नाल्यांत साचून रस्ते पाण्याखाली जात असल्याचे नेहमीचेच चित्र आहे. यंदाही असाच प्रकार घडल्यास या खड्ड्यांमुळे मात्र मोठमोठे अपघात घडण्याची शक्यता टाळता येणार नाही.