विजय मानकर सालेकसातालुक्यातील दरेकसा व आसपासच्या परिसरातील ३० पेक्षा जास्त गावे मागील दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीच्या संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. या भागात मोबाईल टॉवर मंजूर असताना भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरेकसा परिसर हा गोंदिया जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील असून डोंगराळ व अतिदुर्गम भाग आहे. या परिसरात एकूण चार ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गत जवळपास ३० गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे वर्षभर नक्षली कारवायांच्या दहशतीत असतात. त्यातच या परिसरातील राहणारे लोक मोबाईल फोनच्या माध्यमातून तालुका किंवा जिल्ह्याच्या संपर्कापासून गेल्या दीड वर्षांपासून वंचित आहेत. दरेकसा (जमाकुडो) येथे बी.एस.एन.एल.चे टॉवर होते. दीड वर्षापूर्वीपर्यंत त्या टॉवरच्या भरवशावर परिसरातील लोकांनी बी.एस.एन.एल. कंपनीचे सीमकार्ड घेवून संपर्कासाठी मोबाईलचा उपयोग करीत राहिले. परंतु दीड वर्षापूर्वी नक्षलवाद्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी जमाकुडो येथील टॉवरचे मशीन कक्ष जाळून खाक केले. त्याचबरोबर याच परिसरातील टोयागोंदी येथील ग्रामपंचायत इमारतीला आग लावली. त्याच ग्रामपंचायतीचे संपूर्ण रेकार्ड जळून राख झाले. या घटनेला दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही बीएसएनएल कंपनीने दुसरे टॉवर व मशीन स्थापित केली नाही. त्यामुळे मागील दीड वर्षापासून या परिसरातील लोक मोबाईल सेवेतून वंचित आहेत. तसेच तालुका मुख्यालयापासून हा परिसर खूपच दूर आणि पर्वतरांगांच्या पलीकडे असल्याने तालुक्याच्या ठिकाणावरुन कव्हरेज मिळू शकत नाही. दरेकसा परिसरात दरेकसा, टोयागोंदी, जमाकुडो आणि कोसमतर्रा या चार ग्रामपंचायतींचा समावेश असून या भागात जवळपास ३० पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या गावांचा समावेश आहे. यात दरेकसा ग्रामपंचायतअंतर्गत डहाराटोला, बंजारी, नवाटोला, बेवरटोला, दलदलकुही, मुरकुटडोह १,२,३, दंडारी १ व २, टेकाटोला, मुंशीटोला आदी गावांचा समावेश आहे. जमाकुडो ग्रामपंचायतअंतर्गत जमाकुडो, भर्रीटोला, पठानटोला या गावांचा समावेश आहे. टोयागोंदी या ग्रामपंचायतअंतर्गत टोयागोंदी, बोईरटोला, चांदसूरज, बरटोला, विचारपूर, ढुबरुटोला, कोपालगढ, दल्लाटोला, आंबाटोला आदी गावांचा समावेश आहे. कोसमतर्रा, नवाटोला, धनेगाव, सोनारटोला, पिपरटोला या गावांचा समावेश आहे. असे एकंदरित ३० पेक्षा जास्त गाव या भागात मोडतात. या भागात राहणारे लोक गरीब, आदिवासी असून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचे प्रमाणसुद्धा मोठे आहे. गरीब आदिवासी लोकांची प्रकृती अचानक गंभीर झाल्यास त्यांना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सालेकसा, गोंदिया येथील खासगी दवाखान्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही गावात फोन सेवा नसल्याने अनर्थ घडण्याचे प्रकरणसुद्धा घडत असतात. दरेकसा (जमाकुडो) येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन, दोन हायस्कूल, दोन उच्च माध्यमिक विद्यालय, अनेक गावात प्राथमिक शाळा व नक्षलग्रस्त भाग असल्याने येथे एक सशस्त्र दूरक्षेत्रसुद्धा स्थापित आहे. परंतु सामान्य लोकांकडे दळण वळणाचे साधन नसल्याने या भागाशी थेट संपर्क साधणे अवघड असते. यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
३० गावे कव्हरेज क्षेत्राबाहेर
By admin | Updated: December 20, 2014 01:45 IST