गोंदिया : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी पीक मात्र चांगले येण्याची शक्यता प्रशाकीय अहवालात वर्तविण्यात आली आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार सध्याच्या परिस्थितीत पैसेवारी १०८ पैसे दाखविण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन चांगले होणार या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आणि आशादायक वातावरण दिसून येत आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. सततच्या पावसाने ओल्या दुष्काळाची परिस्थिती होती. ऐन धान कापणीच्या सुमारासही पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या धानाचे बरेच नुकसान झाले होते. गेल्यावर्षी याच काळात कााढण्यात आलेली नजरअंदाज पैसेवारी अवघी ६८ पैसे होती. त्या तुलनेत यावर्षीची नजरअंदाज पैसेवारी १०८ पैसे असणे म्हणजे चांगले पिक येण्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या अंतिम पैसेवारीत तिरोडा तालुक्यातील ११ गावांमध्ये अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. त्यामुळे त्या गावांना विविध प्रकारच्या शासकीय सवलती देण्यात आल्या होत्या. वास्तविक त्या वेळी इतरही तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसून नुकसान झाले होते. मात्र तालुक्याचे सरासरी उत्पन्नाची पैसेवासी ५० पैसेपेक्षा अधिक आल्याने त्या गावांना कोणताही लाभ होऊ शकला नाही.गेल्यावर्षी जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल १७६१ मिमी पाऊस बरसला होता. वास्तविक जिल्ह्यात वर्षाकाठी सरासरी १३२७.४४ मिमी पाऊस पडतो. परंतू गेल्यावर्षीचा पाऊस सरासरीच्या तुलनेत १३३ मिमी होता. तरीही नुकसानीचा पिकांच्या आकडा फारसा वाढला नाही. यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत अवघा ९५६.९ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत ७२ टक्केच आहे. म्हणजे २८ टक्के पाऊस कमी पडला आहे. तरीही यावर्षी पिकांची स्थिती उत्तम असल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.गेल्या १४ आॅक्टोबरला जिल्हत ३१.१ मिमी पाऊस पडला. पावसाळ्याच्या शेवटच्या काही दिवसात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिकांना पावसाची आवश्यकता होती. त्यावेळी बरसलेला हा पाऊस पिकांसाठी जीवनदायी ठरला आहे. त्यामुळे बरीच पिके वाया जाण्यापासून वाचली.गेल्यावर्षी गोंदिया तालुक्याची नजरअंदाज पैसेवारी अवघी ६८ पैसे होती. ती यावर्षी १११ पैसे आहे. गोरेगाव तालुक्याची पैसेवारी ६२ होती ती यावर्षी १०९ पैसे झाली आहे. तिरोडा तालुक्याची ६६ वरून १०४ पैसे, अर्जुनी मोरगाव तालुक्यात ६७ वरून १०७ पैसे, देवरी तालुक्यात ६४ वरून ११४ पैसे, आमगाव तालुक्यात ६५ पैशावरून १०६ पैसे, सालेकसा तालुक्यात ७४ वरून १०७ पैसे तर सडक अर्जुनी तालुक्यात गेल्यावर्षीच्या ६६ पैसावरून यावर्षी १०६ पैसे एवढी नजरअंदाज पैसेवारीत वाढ झाली आहे.एकूणच यावर्षीच्या धानपिकाचे उत्पादन चांगले येण्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारी यावर्षी सुख-समृद्धी नांदेल अशी अपेक्षा सर्वांना लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नजरअंदाज पैसेवारी १०८ पैसे
By admin | Updated: October 22, 2014 23:19 IST