कटरे यांचे प्रतिपादन : तालुकास्तरीय रमाई जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमसालेकसा : समाज संघटित असल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे सर्वांनी आपापसातले वाद दूर सारून समाजाला संघटित करा. हीच आता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी केले. ते रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या तालुकास्तरीय कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.नागार्जुन बुद्ध विहार समिती, रमाईनगर स्मारक समिती व महात्मा जोतिबा फुले स्मारक समिती आमगाव खुर्द (सालेकसा) यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता रमाई आंबेडकर यांनी तालुकास्तरीय जयंती उत्सव समारंभ घेण्यात आला. त्यानिमित्त सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुख्य जयंती समारंभाच्या अध्यक्षस्थानी बबलू कटरे होते. मार्गदर्शक म्हणून समाजसेविका प्रा. सविता बेदरकर होत्या. अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख क्षीरसागर, शिवसेनेचे तालुका प्रमुख कुलतारसिंग भाटिया, एसीड संस्थेचे संचालक राजकुमार रामटेके, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, सदस्य ब्रजभूषण बैस, रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष शोभाराम शहारे, महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष आनंद भास्कर, विजय मानकर व इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी कटरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घोषवाक्य ‘शिक्षित बना, संघटीत व्हा व संघर्ष करा’ या मूलमंत्राची आठवण करून दिली. त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कुलतारसिंग भाटिया, आर.ए. रामटेके यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.जयंती समारंभानिमित्त सकाळी सर्वप्रथम सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी बंडीवार, सरपंच योगेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर दुपारी ३ वाजतापर्यंत बौद्ध समाजाच्या वतीने रॅली काढून नगर भ्रमण करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता नगरभोज करविण्यात आले. त्यानंतर राजेश बघेले यांच्या एव्हरग्रीन आर्केस्ट्राच्या माध्यामातून भीमगीतांचा गजर चालला. रमार्इंच्या जीवनावर आधारित अनेक गीतांनी संपूण सालेकसा नगर दणाणले.संचालन शालू साखरे यांनी केले. आभार निर्दोश साखरे यांनी मानले. रॅलीच्या नगरभ्रमणप्रसंगी राजकुमार रामटेके यांच्या वतीने अल्पोहार व शरबत वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी राहुल देऊळकर, हेमंत देऊळकर, सतीश करवाडे, विजय जांभूळकर, रमेश करवाडे, राजेश भास्कर, नवीन शहारे, कमलेश टेंभुर्णीकर, अजय साखरे, कैलाश गजभिये, भीमराव भास्कर, अनिल तिरपुडे, करवाडे, शहारे आदींनी सहकार्य केले.. (तालुका प्रतिनिधी)
संघटित समाज काळाची गरज
By admin | Updated: February 11, 2016 02:12 IST