मुख्यालयी राहण्याची सक्ती करा
गोंदिया : ग्रामीण भागात सेवा देणारे तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकरी व नागरिकांना विविध कामासाठी तालुक्याला यावे लागत आहे. कोरोनाच्या काळात तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने मजुरांचे विलगीकरण तसेच शेतकऱ्यांची काम करणे आदी सेवांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धानपिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय; पण आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. यात दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत नऊ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही गावात व्यायामशाळा नाहीत. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत.
दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब साहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्हास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.
खतांचा अतिवापर धोकादायक
बोंडगावदेवी : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. परंतु, अलीकडे या खतांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो.
ब्रेकर ठरत आहेत धोकादायक
गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी करावी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.